Thursday, July 23, 2026

NITESH RANE : 'नीट'च्या आंदोलनात 'सर तन से जुदा'चे नारे कशासाठी; मंत्री नितेश राणे यांचा सवाल

NITESH RANE : 'नीट'च्या आंदोलनात 'सर तन से जुदा'चे नारे कशासाठी; मंत्री नितेश राणे यांचा सवाल

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंदू राष्ट्रविरोधी शक्तींची घुसखोरी

मुंबई : "राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेशी (नीट) संबंधित आंदोलनात विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा देशविरोधी अजेंडाच अधिक चालवला जात आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवून 'सर तन से जुदा'चे नारे देणे, हिंदू देवी-देवतांचा अवमान करणे आणि पोलिसांवर चिखलफेक करण्याचे काम सुरू आहे. हे कृत्य करणारे सामान्य विद्यार्थी असूच शकत नाहीत," असे मत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात हिंदू राष्ट्रविरोधी शक्तींची घुसखोरी झाली असून, आंदोलनाची आणि देशातील तरुणाईची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "परीक्षेच्या रचनेत सुधारणा झाल्या पाहिजेत यावर कोणाचेही दुमत नाही. केंद्र सरकार आणि संबंधित मंत्री या विषयावर अत्यंत सकारात्मक असून त्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात आहेत. यंदा जवळपास ११ लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. असे असताना आंदोलनाच्या नावाखाली 'सर तन से जुदा'च्या घोषणा देणे, 'सीता का पती' असा उल्लेख करून हिंदू धर्माची मानहानी करणे आणि पोलिसांना व सैन्याला शिवीगाळ करण्याचे काम कोण करत आहे?" असा सवाल त्यांनी केला. जर हिंमत असेल, तर अन्य धर्मीयांच्या बाबत असा उल्लेख करून दाखवावा," असे आव्हानही त्यांनी दिले.

काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री राणे म्हणाले की, "काँग्रेसच्या कार्यकाळात अनेकदा परीक्षांचे पेपर फुटले होते, तेंव्हा त्यांनी किती शिक्षणमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे राजीनामे घेतले? स्वतःच्या कार्यकाळात कोणतीही कारवाई न करणारे आज भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधानांवर टीका करत आहेत. केंद्रातील मोदी सरकार किमान या व्यवस्थेत सुधारणा करण्याची मानसिकता तरी दाखवत आहे. मात्र, या आंदोलनाआडून विरोधक देशाच्या विरोधात असलेल्या प्रत्येक शक्तीला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत", असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींनी राजकीय उंचीप्रमाणे मोदींबद्दल बोलावे

  • राहुल गांधींच्या तोंडी देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी अजिबात शोभत नाहीत. म्हणूनच देशातील जनतेने त्यांना व त्यांच्या काँग्रेस पक्षाला घरी बसवले असून, त्यांना वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वतःच्या राजकीय उंचीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलावे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
  • अशा आंदोलनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल किंवा देवी-देवतांचा अपमान करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जनतेने पूर्णपणे नाकारले असून, देशवासीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा दावा त्यांनी केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >