Sunday, June 21, 2026

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील घट लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव (स्विमिंग पूल) दि. 20 जून ते 30 जून 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या दि. 20 जून 2026 च्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे अद्याप मान्सून जिल्ह्यात पूर्णपणे दाखल झालेला नसून उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 28 लघुप्रकल्पांमध्ये सरासरी केवळ 17.89 टक्के तर हेटवणे मध्यम प्रकल्पामध्ये 27.31 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच महावेध पोर्टलवरील अहवालानुसार दि. 20 जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ 8.9 मि.मी. म्हणजेच सुमारे 2 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी स्विमिंग पूल बंद ठेवणे, पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि अनधिकृत पाणीवापर थांबविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतांचे मुख्याधिकारी, पनवेल महानगरपालिका, ग्रामपंचायती, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलाव तात्काळ बंद राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीपुरवठ्यातील कपातीबाबत नागरिकांना पूर्वसूचना देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >