Sunday, June 21, 2026

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडून यंदा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडून यंदा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

- कोकणातील आंबा-काजूचे नुकसान आणि दुष्काळाच्या सावटामुळे पालकमंत्र्यांचे संवेदनशील पाऊल

- कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष न भेटता आपापल्या जिल्ह्यात 'गो-सेवा' व समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन

मुंबई : "कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेले नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, राज्यभर एल-निनोच्या सावटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर, यंदा २३ जून रोजी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे," अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. आपल्या अधिकृत 'ट्विटर हँडल'वरून त्यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, सध्याच्या कठीण काळात कोणत्याही प्रकारच्या आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतानाच मंत्री नितेश राणे यांनी आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. "माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात 'गो-सेवा' करावी व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. हिंदुत्वाच्या संस्कारातून गोमातेची सेवा, गोसंवर्धनाच्या कार्यात सहभाग तसेच गरजूंना मदत आणि समाजहिताचे कार्य हेच खरे उत्सवाचे स्वरूप आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

सध्याच्या या दुष्काळी आणि टंचाईच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी दाखवलेला हाच सेवाभाव माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल, असे सांगत त्यांनी आपल्या संदेशाचा शेवट 'जय श्री राम !' या घोषणेने केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा