Saturday, June 20, 2026

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक दिंडीने वारकऱ्यांची संख्या व मुक्कामाच्या ठिकाणांची माहिती २५ जूनपूर्वी प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने वारीदरम्यान पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रस्ते तातडीने खड्डेमुक्त करा

वारी मार्गावरील रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करावेत, वाहतूक व्यवस्थापनासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि मुक्कामस्थळी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे, कचरा व्यवस्थापन (Waste Management) आणि अखंडित वीजपुरवठा (Uninterrupted power supply) उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच वारकऱ्यांसाठी वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

वारकऱ्यांसाठी मोफत उपचाराची व्यवस्था

महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी (Mahatma Phule Jan Arogya Yojana) संलग्न रुग्णालयांमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत उपचाराची व्यवस्था करण्याबरोबरच प्रत्येक दिंडीसाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक असलेली स्वतंत्र संपर्कसूची तयार करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारी नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पालखी प्रमुख आणि दिंडी प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित दिंडी प्रतिनिधींनी दिंडी मार्गांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, फिरती शौचालये आणि स्नानगृहे, मुक्कामासाठी मंडप तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी, पैठणची शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज पालखी, पारनेरची संत निळोबाराया पालखी आणि त्र्यंबकेश्वरची विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी यांच्यासह विविध दिंड्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >