Wednesday, June 17, 2026

Opration Tiger : उबाठाच्या ६ खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

Opration Tiger : उबाठाच्या ६ खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

- शिवसेनेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा; वर्धापनदिनी मांडणार भूमिका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'ला (Opration Tiger) अखेर यश आले असून, उबाठा गटाच्या ६ बंडखोर खासदारांनी एकत्र येत स्थापन केलेल्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om birla) यांनी बुधवारी कायदेशीर मंजुरी दिली आहे. दिल्लीत कमालीच्या गुप्ततेत आणि वेगाने घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे उबाठाला लोकसभेत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात या फुटीची सर्व कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया सकाळी ११.३० वाजता पूर्ण झाली असून, यामुळे आता बंडखोर खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे ६ बंडखोर खासदार जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

या संपूर्ण राजकीय भूकंपाची पटकथा दिल्लीत अत्यंत काळजीपूर्वक लिहिली गेली होती. उबाठाच्या एकूण ९ खासदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांचा हा गट फुटीवर ठाम राहिल्याने त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी अपात्रतेची कारवाई टळली आहे. या गटामध्ये प्रामुख्याने खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या फुटीची पायाभरणी १० जून रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या एनडीएच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) बैठकीदरम्यानच झाली होती. या हॉटेलमध्ये रात्री ११ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अत्यंत गुप्त बैठकीला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर खासदार उपस्थित होते आणि त्याच वेळी या संपूर्ण बंडावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर बुधवार, १७ जून रोजी सकाळी सर्व बंडखोर खासदार आपल्या स्वाक्षऱ्यांचे पत्र सोबत घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पहिली बैठक नियोजित होती, मात्र सुरक्षेचा आणि गुप्ततेचा उपाय म्हणून या खासदारांनी दिल्लीतच एका अज्ञात स्थळी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर सुमारास लोकसभा अध्यक्षांनी या नव्या गटाला कायदेशीर मान्यता दिली.

उबाठाच्या पदरी निराशा

उबाठाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आणि बंड रोखण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून होते, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. उबाठाचे ९ पैकी ६ खासदार फुटल्यामुळे आता त्यांच्याकडे केवळ ३ खासदार शिल्लक राहिले आहेत. लोकसभेत स्वतःचे संख्याबळ वाढवण्यात यश आल्यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर होणाऱ्या या खासदारांच्या प्रवेशामुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांना एक नवी आणि वेगळी दिशा मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा