Saturday, June 13, 2026

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन या आव्हानांमुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोकण रेल्वे महामंडळाने प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी केंद्र सरकारकडे निधीचा प्रस्ताव पाठविला असून प्राधान्य विभागांमध्ये तांत्रिक तपासणीची प्रक्रियाही सुरू केली आहे.

कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पावसाळापूर्व तयारीच्या आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. मुंबई, गोवा, कर्नाटक आणि केरळला जोडणाऱ्या ७४१ किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाली आहे. मात्र ९० टक्क्यांहून अधिक मार्ग आजही एकेरी आहेत. दुपदरीकरणाचा विषय गेल्या दशकभरापासून चर्चेत असला तरी निधीची कमतरता, भौगोलिक अडचणी आणि तांत्रिक गुंतागुंत यांमुळे प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. सह्याद्री पर्वतरांगांमधून, खोल दऱ्या, पूल आणि ९० हून अधिक बोगद्यांमधून जाणारा हा मार्ग असल्याने हा प्रकल्प भारतीय रेल्वेसाठी अत्यंत आव्हानात्मक मानला जातो.

सध्या रोहा-वीर (४६.८ किमी) आणि गोव्यातील मडगाव-माजोर्डा (७.६६ किमी) हे विभाग वगळता वीरनंतरचा बहुतांश मार्ग एकेरी आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांना मार्ग देण्यासाठी विविध स्थानकांवर क्रॉसिंगची व्यवस्था करावी लागते. एका गाडीला झालेला विलंब इतर गाड्यांवरही परिणाम करत असल्याने संपूर्ण मार्गावरील वेळापत्रक वारंवार विस्कळीत होते. विशेषतः मुंबई-गोवा आणि मुंबई-मंगळुरू मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसत असल्याचे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.

कोकण रेल्वेवरील दुपदरीकरणाची गरज गणेशोत्सवाच्या काळात अधिक प्रकर्षाने जाणवते. दरवर्षी चाकरमानी कोकणात परतत असल्याने विशेष गाड्यांची मोठी मागणी असते. मात्र उपलब्ध मार्गक्षमता मर्यादित असल्याने अतिरिक्त गाड्या चालविताना रेल्वे प्रशासनाला कसरत करावी लागते. अनेकदा विशेष गाड्यांची मागणी आणि उपलब्ध क्षमतेमध्ये तफावत निर्माण होते. दुपदरीकरण पूर्ण झाल्यास भविष्यात अधिक विशेष गाड्या चालविणे, गर्दीचे प्रभावी नियोजन करणे आणि प्रवाशांना दिलासा देणे शक्य होणार आहे. सध्या वैभववाडी रोड ते माजोर्डा (१५१ किमी) तसेच ठोकूर ते मूकांबिका रोड (बिंदूर) (११२ किमी) हे विभाग प्राधान्याने विचाराधीन आहेत. या विभागांना मंजुरी मिळाल्यास सिंधुदुर्ग, गोवा आणि किनारपट्टी कर्नाटकातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरळीत होईल.

सुमारे ७४१ किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गापैकी आजपर्यंत केवळ रोहा-वीर (४६.८ किमी) आणि गोव्यातील मडगाव-माजोर्डा (७.६६ किमी) या विभागांचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच एकूण मार्गापैकी ९० टक्क्यांहून अधिक भाग आजही एकेरी रेल्वेमार्गावरच अवलंबून आहे. दुपदरीकरणाच्या पुढील टप्प्यात वैभववाडी रोड-माजोर्डा (१५१ किमी) आणि ठोकूर-मूकांबिका रोड (११२ किमी) या दोन विभागांना प्राधान्य देण्यात आले आहे. या दोन्ही विभागांसाठी व्यवहार्यता अभ्यास आणि तांत्रिक तपासणी सुरू असून निधीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विशेषत: वैभववाडी रोड-माजोर्डा विभागात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी आणि मडगावसारखी महत्त्वाची स्थानके येत असल्याने या टप्प्याकडे सिंधुदुर्ग आणि गोव्यातील प्रवाशांचे विशेष लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा