Thursday, June 11, 2026

संचिताची सुरुवात

संचिताची सुरुवात

जीवन संघीत- सद्गुरु वामनराव पै आम्ही या आधीही अनेकदा आमच्या प्रबोधनातून संचित हा विषय मांडला आहे. किंबहुना माणूस जन्माला येताना मागच्या जन्माचे संचित घेऊनच येतो असे आमचे मत आहे. आता यावर एका माणसाने प्रश्न विचारला की जेव्हा मानवजातीला सुरुवात आली तेव्हा संचित कुठून आले? तेव्हा संचित होते का असाही प्रश्न लोक करतात. याचे उत्तर म्हणजे मानवजातीला सुरुवात झाली तेव्हा संचित नव्हते. तेव्हा क्रियमाण महत्त्वाचे !!! संचित नाही म्हणजे प्रारब्ध नाही, तेव्हा क्रियमाण महत्त्वाचे! सुरुवात तेव्हा, कशी झाली ? धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात करताना एक रेघ मारलेली असते. तिथूनच सगळे धावायला सुरुवात करतात. तिथे जसे सगळे एकाच वेळेला धावायला सुरुवात करतात तसेच काहीसे इथे सुद्धा घडले. एकाच वेळेला सगळ्यांनी सुरुवात केली, तिथे संचित नाही. तिथे प्रारब्ध नाही. तिथे धावताना कोणी जास्त वेळात धावतो, कोणी कमी वेळात धावतो. कोणी धावतच नाही, काही जण धावताना आळस करतात. तिथूनच संचिताची नाही, पण पाप पुण्याला सुरुवात झाली. नियतीला सुरुवात झाली. सांगायचं मुद्दा ही सगळ्या प्रश्नांना उत्तरे असतात मात्र आपण शोधायचा प्रयत्न करीत नाही. विचार करीत नाही, म्हणून ती मिळत नाहीत. संचित जे घेऊन आलेलो आहोत, त्याचे विचार करायचे कारण नाही, किंबहुना प्रारब्ध जे वाट्याला आलेले आहे त्याचा ही विचार करायचे काहीही कारण नाही. हे प्रारब्ध भोगतो कसे? खरी गुरुकिल्ली इथेच आहे. कारण क्रियमाण सर्वात महत्त्वाचे आहे. जीवनाची खरी गुरुकिल्ली ही क्रियमाणातच आहे. प्रारब्ध हे दोन्ही प्रकारचे असते, म्हणून ते भोगतो कसे हे महत्त्वाचे आहे. श्रीमंती उपभोगत असताना इतरांशी प्रेमाने वागून, सर्वांशी चांगले संबंध ठेवून जर ते भोगले तर तो शुभ नियती निर्माण करतो व पुन्हा श्रीमंती भोगतो. या उलट ह्याचा त्याचा अपमान करून, त्यांना शिव्याशाप देऊन मी कोणीतरी मोठा आहे असे दाखविण्याचा प्रयत्न जात कोणी करतो तर तो अशुभ नियती निर्माण करतो. पाप निर्माण करतो. आधी सांगितले तसे वागले तर ते पुण्य आणि असे कोणी वाईट वागले तर त्यातून पाप निर्माण होते. म्हणजेच क्रियमाणातून पाप, पुण्य निर्माण होते व व ह्यातूनच पुढे हे पाप अथवा पुण्य परिपक्व झाले, शुभ किंवा अशुभ नियती निर्माण होते. ही नियती फळाला आली की त्यातूनच सुखदुःख किंवा नशीब तयार होते.जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे. तो म्हणजे माणूस हा त्याच्या स्वतःच्याच विचार, उच्चार, आचार ह्यांच्याद्वारे नियती निर्माण करीत असतो आणि त्याने निर्माण केलेली त्याचीच नियती त्याच्याच जीवनावर बरा किंवा वाईट प्रभाव टाकीत असते. किंबहुना नियती म्हणजे नेमके काय हे जर माणसाला उमजले तर त्याची नियत बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संचित ते नशीब हा एवढा प्रवास आहे. जीवन जगात असताना प्रत्येक माणसाला हा एवढा प्रवास करावा लागतो. संचित ते थेट नशीब.

Comments
Add Comment