Monday, May 18, 2026

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion) उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीच्या कामाला आता वेग आला असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या पुलामुळे सायन परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार

शीव रेल्वे स्थानकाजवळ असलेला हा जुना उड्डाणपूल अनेक वर्षांपासून वाहतुकीसाठी वापरला जात होता. मात्र पुलाची रचना जुनी झाल्याने तसेच मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांमधून हा पूल जात असल्यामुळे त्याची पुनर्बाधणी करणे आवश्यक ठरले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव तयार केला आणि हे काम मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आले.

या प्रकल्पामध्ये पुलाच्या मुख्य पुनर्बाधणीचा खर्च मध्य रेल्वेकडून केला जात आहे, तर पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या जोडरस्त्यांच्या कामात विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मूळ बांधकाम आराखड्यात काही बदल करावे लागले. परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढला असला तरी नवीन बांधकाम तंत्रज्ञान आणि सुधारित नियोजनामुळे आता कामाचा वेग वाढल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

१५ ऑगस्टपासून पूल वाहतुकीसाठी खुला?

सध्या या पुलावर गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार दोन्ही गर्डर बसवण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित बांधकाम आणि अंतिम कामे पूर्ण करून संपूर्ण प्रकल्प १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास हा शीव उड्डाणपूल १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दररोज सायन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची मोठी सुटका होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा