Sunday, May 17, 2026

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे

अंधेरीतील लाडक्या बहिणींचा सन्मान मेळावा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न

मुंबई : आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे हा आमचा अजेंडा असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंधेरीतील शेर-ए-पंजाब नगर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना, लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथे आमंत्रित केले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. आम्ही गरिबी पहिली आहे. आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. कुणी मायचा लाल आला तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही असे यावेळी पुन्हा एकदा जाहीर केले.

मुरजी काकाने २५ हजार महिलांच्या बचत गटाचे जाळे निर्माण केले आहे. खरे म्हणजे लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३२ आमदार निवडून देत एक इतिहास घडवलेला आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल मिळाला तो या लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाला. रक्षाबंधन लांब असले तरीही मुरजी काकाने सर्व लाडक्या बहिणींना एकप्रकारे रक्षा बंधनाची ही ओवाळणी दिलेली आहे.

आज आपण खऱ्या अर्थाने महिलाना सक्षम करतोय त्यांच्यासाठी योजना तयार करतोय. त्यांना आत्मनिर्भर बनवतो आहे. त्यांना एसटी मध्ये ५० टक्के सवलत आपण दिली. मुलींचे उच्च शिक्षण आपण मोफत केले, आपल्या नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलाना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असे सांगितले.

मुरजी काकाच्या डोक्यात कायम लोकांसाठी काम करत राहणे एवढाच विचार असतो, आज याठिकाणी लाडक्या बहिणींना ओवाळणी देऊन सन्मानित केले. यासोबतच या भागात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले. विद्यार्थांना शिक्षणासाठी लागणाऱ्या लॅबटॉपचे वाटप देखील इथे करण्यात आले आहे. ज्यांना यश मिळाले त्यांचे अभिनंदन, आपल्या आयुष्यातील ही यशाची पहिली पायरी आहे अजून संपूर्ण आकाश जिंकणे बाकी आहे असेही सांगितले. मला विद्यार्थ्यांना एवढेच सांगायचे आहे खूप अभ्यास करा, मेहनत करा, आपल्या आई वडिलांचे, आपल्या देशाचे आणि राज्याचे नाव मोठे करा.

मुरजी काका सर्वसामान्यांचा हाकेला धावणारा कार्यकर्ता आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षणासाठी लागणारी मदत असेल, फी भरण्यासाठी लागणारे पैसे असतील, शैक्षणिक साहित्य असेल या सगळ्यांच्या वाटपात मुरजी काका कायम पुढे असतो. त्यांच्या भागातील मंडई आणि दवाखान्याचे भूमिपूजन आम्ही केले होते. ज्या कामांचे भूमिपूजन आम्ही करतो ती कामे आम्ही पूर्ण करतो असेही शिंदे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आज इथे कार्यक्रम सादर झाला त्यांचेच विचार आम्ही पुढे घेऊन चाललो असल्याचे सांगितले. जसे अभिनेता राजेश खन्नाला लोकं प्रेमाने काका म्हणायचे तसेच मुरजीला पण प्रेमाने लोकं काका म्हणतात त्यामुळे मुरजी हा आपल्या पक्षाचा सुपरस्टार आहे असे यावेळी सांगितले. मुरजी त्याच्या मतदारसंघात १२ बुद्धविहार बांधले आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान ग्रंथालय बांधतो आहे, ३ ते ४ उद्याने विकसित केली आहेत. मेट्रोची ७ स्थानके त्याच्या मतदारसंघात आहेत. वाहतूक कोंडी मुक्त अंधेरी त्याला करायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.

आपण स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार आहोत, आज महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर वन आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर वन आहे. स्टार्ट अप मध्ये नंबर वन आहे. त्याप्रमाणे मुरजी काका कामात नंबर वन आहे असेच आज म्हणावे लागेल असे शिंदे यांनी नमूद केले.

मुंबईत सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट नव्हते ते आपण केले. काँक्रीटचे रस्ते नव्हते ते आपण केले, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू केले. आज या भागात ८ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू असल्याचे सांगितले.

आज जगाला युद्धाची चाहूल लागली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मात्र अशा परिस्थितीतही देश भक्कमपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केले त्याची आपण अंमलबजावणी करतो आहे. पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन जेवढी शक्य तेवढी इंधन कपात करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियमावली तयार केली आहे. हे सारे राष्ट्रहितासाठी आपण करत आहोत, काही लोक याची टिंगल करतात पण देश जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे रहायला पाहिजे असे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.

शिवसेनेची आज राज्यभर घोडदौड सुरु आहे. विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या या सगळ्या निवडणुकीत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. राज्यात आता एस आय आर चे काम सुरू आहे..यात पक्षाच्या वतीने या कामावर देखरेख ठेवा, मतदार याद्यांमध्ये आपले मतदार कायम राहतील यासाठी दक्ष रहा तसेच घुसखोरी होणार नाही याबाबत काळजी घ्या. आता निवडणुका संपल्या असून संघटना वाढीसाठी सर्वांना कार्यरत रहावे लागेल असे सांगून त्यासाठी कामाला लागावे असे आवाहन सर्वांना केले.

यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मुरजी पटेल, कमलेश राय, कुणाल सरमळकर, सदानंद परब, कला शिंदे, शिल्पा वेल्हे, चंद्रावती मोरे, सुनीला येलावडेकर, संतोष गिरी, मनिष नायर, अविनाश सावंत आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा