मुंबई : शहरातील रिक्षावाल्यांना मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. सरनाईक यांच्या या निर्णयाचे शिवसेना, मनसे पक्षाकडून स्वागत होत असून शिवसेना नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला आपला विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी संजय निरुपम हे दहिसरमधील रिक्षा चालकांसोबत संवाद साधण्यासाठी आले होते. त्याचवेळी, मनसैनिकांनी संजय निरूपम यांच्या यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाला. टॅक्सी रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीवरून मुंबईत दहिसरमध्ये पहिली ठिणगी पडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा सक्तीची केली असून त्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संजय निरुपम यांनी मराठी न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. रिक्षाचालकांपैकी ७० टक्के लोक परप्रांतीय असल्याचे सांगत या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सक्तीला विरोध दर्शवत रिक्षाचालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसेने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह दहीसर येथील गणपत पाटील नगर रिक्षा स्टॉप गाठत संजय निरुपम यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. एकीकडून शिंदे शिवसेना पदाधिकारी तर दुसरीकडून मनसे पदाधिकारी असा साधारणपणे अर्धा ते पाऊण तास गोंधळ पाहायला मिळाला. जोपर्यंत संजय निरुपम जात नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करत राहणार असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला. सगळ्यांसोबत संवाद साधून संजय निरुपम त्या ठिकाणाहून निघत असताना मनसैनिक आक्रमक झाले, त्यांनी निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या, दगड फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि वातावरण शांत केले. मात्र, या घटनेने शिवसेना आणि मनसैनिकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.
दरम्यान, दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीला विरोध करत थेट मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनाच लक्ष्य केले. रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या संपावेळी मराठी रिक्षाचालकांना कोणी अडवले तर आम्ही त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला. आता, त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू… अमित ठाकरे हवालदार झालेत का? त्यांचे बोलणे सुज्ञपणाचे नाही. तुम्ही हवालदार झाला आहात की आरटीओचे शिपाई झाला आहात? अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.





