Monday, April 6, 2026

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर

मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मंगळवार, ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मेट्रो मार्गिका ९ आणि २-बी च्या पहिल्या टप्प्यांचे उद्घाटन, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ आणि अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे ई-भूमिपूजन अशा 'विकासाच्या चतुःसूत्री'चा समावेश आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असून, मुंबईकरांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने' 'प्रवास क्रांती'चा ठरणार आहे. प्रकल्पांची व्याप्ती मोठी असल्याने कार्यक्रमाचे आयोजन तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजता दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथून होईल. तेथे मेट्रो मार्गिका ९ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाईल. त्यानंतर, सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री ठाण्यातील मानपाडा येथे पोहोचतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या आणि ठाणे-बोरिवलीतील अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी येथे 'टीबीएम' (टनेल बोअरिंग मशीन) लॉन्च करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचा समारोप दुपारी १२.३० वाजता चेंबूरमधील डायमंड गार्डन मेट्रो स्थानक येथे होईल. यावेळी मेट्रो लाईन २-बी च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासोबतच, मुंबईत पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री करतील. सार्वजनिक वाहतुकीला तंत्रज्ञानाची जोड देऊन मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

फायदा काय होणार?

मेट्रो मार्गिका ९ आणि २-बी मुळे उपनगरातील प्रवाशांचा लोकलवरील ताण कमी होणार असून, पश्चिम आणि पूर्व उपनगरे मेट्रोने अधिक सक्षमपणे जोडली जाणार आहेत.

Comments
Add Comment