आचार्य नयन पद्मसागर यांचे वादग्रस्त विधान; मराठी भाषेची रचना देखील जैन आचार्यने केल्याचा दावा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या आणि औरंगजेबाचा नाश करण्यासाठीच या 'जैन' महाराणीचा जन्म झाला, असे खळबळजनक विधान आचार्य नयन पद्मसागर यांनी केले आहे. तसेच मराठी भाषेची रचना आणि महाराष्ट्रातील 'पाटील' ही परंपराही जैन धर्माशी निगडित असल्याचा दावा त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
महावीर जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील विविध दाखले देत जैन समुदायाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा उल्लेख थेट 'जैन महाराणी' असा केला.
आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, तेव्हा औरंगजेबाचा नाश करण्यासाठी आणखी एका जैन महाराणीचा जन्म झाला, त्या म्हणजे ताराराणी. केवळ ताराराणीच नव्हे, तर मेवाडच्या राणीचा उल्लेखही त्यांनी जैन असा केला. मराठी भाषेची रचना जैन आचार्यांनी केली आहे. महाराष्ट्रात १ कोटी १२ लाख जैन आहेत. महाराष्ट्रातील 'पाटील', 'चौघुले', 'सरनाईक' ही आडनावे लावणारे सर्व मूळचे जैन धर्म पाळणारे आहेत, असा दावाही त्यांनी केला.






