मुंबई: कोकणच्या निसर्गसंपदेला आधुनिकतेची जोड देऊन या भूमीचा कायापालट करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राबविलेल्या कार्यपद्धतीचे जाहीर कौतुक बुधवारी विधिमंडळात झाले. कोकणच्या प्रश्नांवर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी अल्पावधीत घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या त्यांच्या 'धडाक्या'चे आमदारांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
या चर्चेत सहभागी होताना आमदार संजय केळकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीचा गौरव केला. ते म्हणाले की, "कोकणात पर्यटनाच्या अथांग संधी आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कोकण विकासाचे जे स्वप्न पाहिले, तेच व्हिजन पुढे नेत मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणासाठी योजनांची भक्कम पायाभरणी केली आहे. विशेषतः मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि जलवाहतूक सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्यपूर्ण आहेत. जलवाहतुकीच्या क्षेत्रात सुरू असलेले वेगाचे काम कोकणच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार शेखर निकम यांनी नितेश राणे यांच्या कार्यतत्परतेचे विशेष अभिनंदन केले. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच राणे यांनी मच्छीमारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, पर्ससीन बोटींचा वाद आणि जेट्टींच्या रखडलेल्या कामांना गती दिल्याचे निकम यांनी नमूद केले. "रोपॅक्सच्या माध्यमातून अत्याधुनिक जलवाहतूक सुरू करून त्यांनी कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवली आहे," असेही ते म्हणाले.
'नॅशनल वॉटर वे - २८'ला चालना देण्याची मागणी
यावेळी आ. निकम यांनी एक महत्त्वाची सूचनाही मांडली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दाभोळ ते पेडे गोळकोट (नॅशनल वॉटर वे - २८) या मार्गाला गती दिल्यास रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. ट्रकची वाहतूक बोटीमार्गे होऊन ते थेट लोटे औद्योगिक क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.






