नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे ड्रोनचे महत्त्व आणखी वाढले आहे. याआधी रशिया - युक्रेन लढाईत दोन्ही देशांनी तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान विरोधात ड्रोनचा शस्त्राप्रमाणे प्रभावी वापर केला. आता भारत शेषनाग १५० नावाच्या नव्या अतिशय प्रभावी आणि संहारक ड्रोनच्या निर्मितीत गुंतला आहे.
पश्चिम आशियातील युद्धात इराण मोजके पैसे खर्चून तयार केलेले ड्रोन हे बॉम्ब प्रमाणे इस्रायल तसेच अमेरिकेविरोधात वापरत आहेत. हे ड्रोन आकाराने लहान आणि वेगवान असल्यामुळे निकामी करणे कठीण आहे. अमेरिका आणि इस्रायल जी आधुनिक क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली वापरतात, त्याने हे ड्रोन निकामी करता येतात. पण अवघ्या काही हजारांचा ड्रोन नष्ट करण्यासाठी लाखो रुपये खर्चून तयारी केलेली महागडी क्षेपणास्त्र वापरली जात आहेत. शिवाय इराणी ड्रोनचा मोठा ताफा आला तर ती सर्व ड्रोन निकामी करणे कठीण जाते आणि किमान काही ड्रोन शत्रूचे नुकसान करण्यात यशस्वी होत आहेत. या घडामोडींचा अभ्यास करून भारताने स्वतःच्या नव्याने विकसित होत असलेल्या ड्रोनमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. यामुळे भारतीय ड्रोन अतिशय प्रभावी आणि संहारक झाले आहेत.
भारताच्या शेषनाग १५० या ड्रोनची ऑपरेशनल रेंज एक हजार किमी. पेक्षा जास्त आहे. यामुळे हे ड्रोन एकदा उड्डाण केल्यानंतर लांबचा प्रवास सहज करू शकतात. सलग पाच तास आकाशात कार्यरत राहण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. निश्चित केलेल्या लक्ष्यावर घिरट्या घालत अथवा लांबून लक्ष ठेवणे, रिअल टाइम पाळत ठेवणे हे काम शेषनाग १५० ड्रोन सहज करू शकतात. तसेच हे ड्रोन २० ते ४० किलो स्फोटके वाहून नेऊ शकतात. विशिष्ट लक्ष्यावर स्फोटके टाकणे अथवा स्फोटकांसह लक्ष्यावर जाऊन आदळणे असेही हा ड्रोन करू शकतो. एकाचवेळी हजारो शेषनाग १५० ड्रोनचा ताफा विशिष्ट परिसरावर हल्ला करण्यासाठी प्रक्षेपित करण्यासाठी चाचण्या सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.