अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कापूस खरेदी योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे कापूस हंगाम २०२५-२६ च्या खरेदीस एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
अकोला जिल्हा व राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ३५ लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भात कापूस वेचणी एप्रिल-मे महिन्यांत सुरू होते, परंतु यावर्षी कापसाची विक्री अधूरी राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक त्रास होण्याची भीती होती. सीसीआयने कापूस खरेदीसाठी अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली होती, मात्र लांबलेला वेचणी हंगाम लक्षात घेता मुदतवाढ करणे आवश्यक ठरले.
आमदार सावरकरांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्रींनी केंद्र सरकारकडे थेट मागणी केली आणि सीसीआयला एप्रिल २०२६ अखेरपर्यंत खरेदी प्रक्रिया चालू ठेवण्याचे सुचविले.
शेतकऱ्यांकडून अद्याप कापसाची विक्री पूर्ण न झाल्याने आणि खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती लक्षात घेऊन ही पावले घेतली गेली आहेत.







