केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ममता बॅनर्जींवर टीका
नवी दिल्ली : आनंदपूरची ही आग ही केवळ एक अपघात नाही तर ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचाराचे उघड प्रदर्शन आहे. मोमो कारखान्यात कोणाचे पैसे साठवले गेले होते? कारखाना मालक कोणाबरोबर परदेशात गेला होता? मालकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही?, असा प्रश्न विचारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
कोलकाताजवळील आनंदपूर मोमो फॅक्ट्रीच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेवरून प्रशासकीय निष्काळजीपणाचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप कार्यकर्ता संमेलनात गर्दीला संबोधित करताना शहा यांनी सर्वप्रथम आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर उत्तर २४ परगणा येथील भाजप कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करताना अमित शहा यांनी प्रश्न मोमो कारखाना प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.
शहा यांनी या घटनेवर राज्य सरकारच्या प्रतिसादावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कामगारांच्या आक्रोशाच्या ३२ तासांनंतरही सरकार गप्प असल्याचे त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले. ते म्हणाले, २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि २७ अजूनही बेपत्ता आहेत. हे भारतीय नागरिक होते; परंतु मुख्यमंत्री ३२ तासांनंतर घटनास्थळी पोहोचल्या. हे लज्जास्पद आहे.
पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहा म्हणाले की, ‘वंदे मातरम’ या गाण्याचे जन्मस्थान असलेल्या बंगालमध्ये ‘वंदे मातरम’ या ओळखीवर हल्ला होत आहे. तसेच शहा यांनी प्रश्न केला की, ‘वंदे मातरमच्या १५० व्या वर्षांत, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत त्याचा विरोध केला. ममता बॅनर्जी मतपेढीच्या राजकारणासाठी बंगालच्या ओळखीच्या विरोधात उभ्या आहेत. बंगालचे लोक हे सहन करतील का?’ असा सवालही केला.
याचबरोबर बेकायदेशीर घुसखोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना अमित शहा यांनी याला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले. सीमा सुरक्षा दलाला सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारने सहकार्य केले नाही, या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने सहकार्य करो अथवा ना करो, मात्र भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर ३५ दिवसांच्या आत सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण केले जाईल.
लवकरच पश्चिम बंगलामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून कंबर कसली आहे. अमित शहा यांनी स्वत: ही जबाबदारी स्वीकारली असून त्यांचा आक्रमकपणे प्रचारही सुरू झाला आहे.






