अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाची धुरा देखील पवार कुटुंबाकडेच राहावी, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडेच दिले जाणार आहे. या सर्व परिस्थितीवर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही." अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे :
शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की; "सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. राष्ट्रवादीने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला. त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे." शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
अजितदादांची ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आमचीसुद्धा इच्छा :
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की; "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात याबाबत गेल्या चार महिन्यांपासून आमच्यात चर्चा सुरू होत्या. त्याचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होते. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय १२ फेब्रुवारीला जाहीर करायचं असं ठरलं होतं. ही तारीख स्वतः अजित पवार यांनी दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा देखील सुरू होती. पण, अचानक ही घटना झाली. अजितदादांची ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आमचीसुद्धा इच्छा आहे." त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी पुढील काही महिन्यांमध्ये एकत्र दिसणार का ? याची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी :
सुनेत्रा पवार यांचा आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवरी रोजी संध्याकाळी ५ वाजता शपथविधी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या असून, त्यांच्यासोबत पुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडेल, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.






