विमानतळावर आधुनिक यंत्रणा बसवण्याचे चार महिन्यांपूर्वीच निर्देश
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्याच्या विमानचालन क्षेत्राचा कायापालट करू इच्छिणारा एक द्रष्टा नेता गमावला आहे. अत्यंत विदारक बाब म्हणजे, ज्या बारामती विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याचे निर्देश त्यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते, त्याच धावपट्टीच्या डागडूजीपूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
ऑक्टोबर २०२५ मध्ये अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी बारामती विमानतळासह राज्यातील इतर छोट्या विमानतळांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता.
बारामतीत पूर्णविराम बारामतीच्या विकासासाठी अजित पवारांनी आपली उभी हयात घालविली. अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरी सांभाळणाऱ्या अजित पवारांची अपघातामुळे अखेर बारामतीत झाली. ज्या परिसराच्या विकासासाठी परिश्रम केले, त्याच परिसरात अजित पवारांच्या कार्याला पूर्णविराम मिळाला आहे. अपघातामुळे बारामती शोकसागरात बुडाल्याचे दिवसभरात पाहावयास मिळाले.
अजित पवारांचे ‘व्हिजन’ बारामती, शिर्डी, यवतमाळ, धाराशिव व लातूर यांसारख्या छोट्या विमानतळांवर पार्किंग हब विकसित करण्याचे त्यांचे नियोजन होते. ‘छोट्या शहरांतूनही विमाने सुरक्षितपणे उडू शकली पाहिजेत, यासाठी त्यांनी रडार व आधुनिक सुरक्षा उपाययोजनांचे जाळे विणण्यास सुरुवात केली होती. राज्यातील विमानचालन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी 'फ्रेमवर्क' तयार केले होते, जेणेकरून पर्यटन आणि उद्योगाला मोठी गती मिळेल.
नशिबाचा खेळ अजित पवारांना बारामती विमानतळ हे जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज करायचे होते. ‘यामुळे ग्रामीण भागातील कृषी निर्यात आणि गुंतवणूक वाढेल,’ असा विश्वास त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केला होता. ज्या ‘सेफ लँडिंग’साठी ते आग्रही होते, तीच व्यवस्था पूर्णत्वास येण्यापूर्वीच बारामतीमध्ये त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. दादांनी पाहिलेले ‘उड्डाण महाराष्ट्राचे’ हे स्वप्न आता अधुरे राहिले असून, त्यांच्या निधनाने राज्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.






