महापालिकेच्यावतीने चेंबूर येथे कार्यक्रमाचे आयोजन, येत्या २८ नोव्हेंबर रोजी पार पडणार कार्यक्रम
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने, ‘स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता’ (उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजता या वेळेत हा कार्यक्रम पार पडेल.
पर्यावरण व वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग) अविनाश काटे यांच्या देखीरेखीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, नागरी सहभागाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचेही आयोजन केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी) अंतर्गत केंद्र शासन, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालय यांच्या सहकार्याने, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (एआयआयएलएसजी) यांचे रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्वायरमेंटल स्टडीज (आरसीयूईएस) यांच्यासह मिळून मुंबई महानगरातील महाविद्यालयांमध्ये ‘उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन’ (ग्रीन लिव्हिंग, बेटर टुमारो) हे अभियान मुंबई महानगरपालिका राबवित आहे.
याच अनुषंगाने, ‘स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता’ (उज्ज्वल भविष्यासाठी हरित जीवन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट) महासंचालक डॉ. जयराज फाटक, संचालक डॉ. अजित साळवी यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहील.
या कार्यक्रमामध्ये युवा नेतृत्व केंद्रीत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम (एनसीएपी), आंतरसक्रिय पर्यावरणपूरक उपक्रम; स्वच्छ वायू, शाश्वतता आणि हरित जीवनशैलींबाबत विद्यार्थ्यांचे अविष्कार, आरसीयूईएससोबत मिळून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून केले जाणारे विविध प्रयत्न आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात येईल.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ८६५७६२२५५०/५१/५२/५४ या क्रमांकांवर संपर्क साधावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






