Monday, November 10, 2025

हापूस आंबा लांबणीवर...!

हापूस आंबा लांबणीवर...!
संतोष वायंगणकर कोकणच्या किनारपट्टीला मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी पाऊस असे समिश्र वातावरण तयार झाले आहे. साहजिकच याचा एक विचित्र परिणाम आंबा बागायतींवर होत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मोहोर येतो. यावर्षी मोहोर आलाच नाही. थंडीही गायब आहे. आता जरी पाऊस थांबला तरीही भरपूर मोहोर येण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे. यामुळे साहजिकच यावर्षीचा प्रथमचा आंबा बाजारात यायला मार्च महिना उजाडणार आहे. त्यामुळे कोकणातील हा हापूस आंबा देशभरातील बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसायला निश्चितच एप्रिल-मे महिना उजाडण्याची शक्यता नाकारता येणार नाही... महाराष्ट्रात पाऊस थांबायचं नाव घेत नाही. कोकणातील भातशेतीवर या अतिवृष्टीचा परिणाम गावो-गावी झाला. यामुळे कोकणातील भातशेती पाण्याखाली गेली. गुरांना लागणारे गवतही मिळणे अवघड झाले आहे. पाणथळ भागात असणारी शेती पाण्याखालीच गेली आहे. यामुळे कोकणातील भातशेती करणारा शेतकरी, तसेच नाचणी आणि तृणधान्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे भातशेतीचे नुकसान झालेले असताना आंबा, काजू बागायतदारही चिंतेत आहेत. याचे कारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस कोसळत आहे. आजही केव्हा आकाश भरून येईल आणि पाऊस कोसळेल ही टांगती तलवार शेतकऱ्याच्या डोक्यावर कायम आहे. साहजिकच याचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे. आंबा बागायतीमध्ये पावसामुळे चिखल आहे. पाऊस कोसळत असल्याने नोव्हेंबरमध्ये येणारी थंडी अद्यापही सुरू झालेली नाही. जो काही भागामध्ये आंबा बागायतीत आंब्यांना मोहोर येतोय असे वाटत होते त्या भागातील आंबा बागायतीत आलेला थोडाफार मोहोरही पावसाने कुजला आहे. सतत जो पाऊस पडत आहे त्यामुळे आंबा, काजू, या फळबागायतींना पोषक वातावरण होणं आवश्यक असते असे वातावरणही तयार झालेले नाही. त्यामुळे त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसणारा आंबा बागायतदार पाऊस कधी जातोय आणि नोव्हेंबर डिसेंबरची कडाक्याची थंडी कधीपासून पडतेय त्या वातावरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते. अनेक आंबा बागायतीत कणीदार मोहोर आलेला असतो. कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकरी आपल्या बागेतील झाडांचा मोहोर पाहून सुखावलेला असायचा. अगदी मार्च, एप्रिल, मे महिन्यात आंबा, काजू बागायतीतून चांगल उत्पन्न मिळेल अशा आशेवर तो असायचा. वर्षभराच्या खर्चाचे आडाखे तो मनात मांडायचा; परंतु यावर्षी मात्र कोकणातील थंडी आणि मोहोरावर अंदाज बांधणाऱ्या या शेतकऱ्याला काय होईल काहीच सांगता येणारे नाहीय. तो चिंतेत आहे. निसर्गाच्या लहरीपणाने नैसर्गिक बदलाने कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिकतेचे चक्रही कोलमडले आहे. कलिंगडाची बागायत शेती करणारा शेतकरीही काय करायचे या चिंतेत आहे. सगळाच हंगाम लांबणार आहे. सुपारी बागायतदार देखील निसर्गचक्रात बेजार झाला आहे. कोकणात जसा आंबा, काजू मोठ्या प्रमाणात होतो तसेच सुपारी, नारळ बागायती क्षेत्रही मोठे आहे. रतांबा बागायती करणारे शेतकरी आहेत. गतवर्षी रतांब्याला चांगला दर आला होता. रतांबा बागायतदार आपल्याकडे कमी आहेत. पूर्वपार वडिलोपार्जित रत आपल्या देशभरात जरी वेगवेगळया जातीचा आंबा तयार होत असला तरीही कोकणच्या हापूसला अगदी जागतिक स्तरावरही तोड नाही. कोकणातील हापूस आंबा स्वादिष्टपणाला सर्वत्र प्रसिद्ध आहे. कोकण म्हटले की देवगड, रत्नागिरी हापूस हे आपसूकच नाव जोडले जाते. कोकणातील हा आंबा वेळेत पावसाने विश्रांती घेतली, भरपूर थंडी पडली, मोहोर वेळेवर आला तर साधारण फेब्रुवारीपासून बाजारात येतो आणि जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापर्यत हा आंब्याचा हंगाम सुरू राहतो. कधी-कधी सुरुवातीला आंब्याचा असणारा दर नंतर मिळत नाही. काहीवेळा आंबा अचानकपणे बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागला की, आंब्याचा दर कमी होतो. आंबा बागायतदार शेतकऱ्याच्या हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. काय घडू शकते याचा अंदाज बागायतदार शेतकऱ्याला येत असतो. यावर्षी अजुनही अधून-मधून कोकणात पाऊस पडत असल्याने आंबा हंगाम महिना-दीड महिना तरी लांबण्याची शक्यता आजच्या घडीला तरी निर्माण झाली आहे. कोकणच्या किनारपट्टीला गेले काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी पाऊस असे समिश्र वातावरण तयार झाले आहे. साहजिकच याचा एक विचित्र परिणाम या आंबा बागायतींवर होत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मोहोर येतो.
Comments
Add Comment