Monday, November 3, 2025

गणेश काळे हत्या प्रकरण, आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी

गणेश काळे हत्या प्रकरण, आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने, गायकवाड टोळीचा म्होरक्या समीर काळे याच्या भावाची हत्या केली. आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून पुण्याच्या कोंढव्यात रिक्षाचालक गणेश काळेवर चार जणांनी हल्ला केला. अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गणेश काळेवर गोळ्या झाडून नंतर कोयत्याने वार केला. या प्रकरणाबाबत काल (२ नोव्हेंबर) कोर्टात सुनावणी पार पडली.

सुनावणीवेळी आरोपी अमन शेख, मयूर वाघमारे आणि अरबाज पटेल या तिघांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास तपास अधिकारी निरीक्षक नवनाथ जगताप आणि सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी म्हटले की, "ही पिस्तुले व कोयता आरोपींनी कुठून आणला, गुन्ह्याचा कट कुठे रचला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, आरोपी आणि अल्पवयीन मुले एकमेकांच्या संपर्कात कशी आली, याची माहिती घ्यायची आहे. तसेच आरोपींचे मोबाईल व ई-मेल तपासून त्यांना खुनाची सुपारी कोणी दिली, याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी."

तर आरोपींचे वकील मिथुन चव्हाण म्हणाले की, "हत्येत वापरण्यात आलेली दोन पिस्तुले मिळाली आहेत. या प्रकरणातील तीन आरोपी आधीच जेलमध्ये आहेत. या आरोपींना जुन्या गुन्ह्याच्या आधारावर आरोपी करायचे असे चित्र पोलिसांनी तयार केले आहे. ज्याची हत्या करण्यात आली त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी होता म्हणून त्या गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा काय संबंध आहे? पोलीस कोठडीची गरज काय ? केवळ वाहन शोधण्यासाठी २ दिवसाची पोलीस कोठडी दिली तर हरकत नाही." आता या प्रकरणात अजून काय धागेदोरे मिळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा