Monday, October 27, 2025
Happy Diwali

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी क्रमांक १८६४ (MH-01 AP 0748) अखेर इतिहासजमा झाली. ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संघटनेकडून या बसगाडीला एक आगळावेगळा, भावपूर्ण आणि सर्वसमावेशक असा निरोप देण्यात आला.

सन २००९ साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास अभियान (JNNURM) अंतर्गत बेस्ट उपक्रमात अशोक लेलँडच्या एकूण ७५० बसगाड्या दाखल झाल्या होत्या. या ताफ्यातील ही शेवटची मोठ्या आकाराची प्रवासी बस होती. पंधरा वर्षे मुंबईच्या रस्त्यांवर अखंड धावत, लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारी सेवा पुरवणाऱ्या या बसगाडीने अखेर आपला अंतिम प्रवास पूर्ण केला.

या शेवटच्या प्रवासानिमित्त ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ संस्थेने एक अनोखा निरोप सोहळा आयोजित केला. संस्थेचे पदाधिकारी, काही हौशी बसप्रेमी मंडळी आणि बेस्ट उपक्रमाचे अभियांत्रिकी कर्मचारी यांनी स्वतः दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी हार, फुले, पताका आणि फुगे यांचा संगम साधून या बसगाडीची आकर्षक सजावट केली. विशेष म्हणजे, अभियांत्रिकी विभागाने संस्थेच्या आग्रहास्तव या बसगाडीची तिच्या निवृत्तीफेरी करिता तिच्या मूळ रंगात पुन्हा रंगरंगोटी केली, तर बेस्टचे निवृत्त अभियंता सुहास पेडणेकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बसगाडीचा ताफा क्रमांक आणि आगाराची पुन्हा नोंद कोरली.

“काही लोकं स्वतःसाठी भाड्याने बस आरक्षित करून निरोप सोहळे साजरे करतात, परंतु आम्ही या विशेष निरोप सोहळ्यात बेस्टचे कर्मचारी आणि प्रवासी दोघांनाही सामील करून हा सर्वसमावेशक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला,”असे आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्थेचे सरचिटणीस सिद्धेश म्हात्रे यांनी सांगितले. बस सजावटीनंतर मालवणी आगारातील वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी प्रसाद दीक्षित यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि केक कापून गाडीला तिच्या शेवटच्या प्रवासासाठी बसमार्ग क्रमांक २०७ वरून दहिसर बस स्थानकाकडे मार्गस्थ केले. या विशेष फेरीतील प्रत्येक प्रवाशाला संस्थेच्यावतीने तिकिटासोबत एक गोड आठवण म्हणून चॉकलेट चे वाटप करण्यात आले.

सद्यस्थितीला बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या बसगाड्या उरल्या आहेत. येत्या १५ नोव्हेंबर २०२५ रोजी शेवटची मिडी बसगाडी सुद्धा निवृत्त होणार असून, त्यामुळे भांडुप आणि मालाड विभागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >