
छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये माओवादी लष्करी शाखेचा प्रमुख व गुप्तचर प्रमुख 'रूपेश' याचाही समावेश आहे. या घटनेने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
मंत्री विजय शर्मा यांनी X वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांत छत्तीसगड, महाराष्ट्र व अन्य भागांमध्ये मिळून एकूण २५८ नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे. काल महाराष्ट्रात ६१ जणांनी आत्मसमर्पण केले.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, रूपेश आणि त्याचे अनेक सहकारी उसपरी घाटातून इंद्रावती नदी पार करून भैरमगडमार्गे विजापूरला पोहोचले. तेथे त्यांनी जगदलपूरमध्ये अधिकृतपणे आत्मसमर्पण केले.
या गटामध्ये एक केंद्रीय समिती सदस्य (CCM), दोन डिव्हिजनल समिती सदस्य आणि १५ जिल्हास्तरीय माओवाद्यांचा समावेश होता. बहुतेक जण माड विभागातील असून, हा परिसर पूर्वी माओवादी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जात होता.
शस्त्रांचा मोठा साठा हस्तगत
या आत्मसमर्पणात मोठ्या प्रमाणावर AK-47, INSAS रायफल्स, SLR आणि कार्बाइन्स यांसारखी आधुनिक शस्त्रे सुरक्षा दलांच्या ताब्यात आली. त्यामुळे दक्षिण छत्तीसगडमधील माओवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
मंत्री विजय शर्मा यांनी म्हटले, "शस्त्र सोडणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो, पण हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा पूर्णतः नायनाट करणे हा आमचा संकल्प आहे."
त्यांनी पुढे नमूद केले की, अबुझमाड व उत्तर बस्तर हे आता नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहेत, आणि दक्षिण बस्तरमधील काही मोजके गट लवकरच संपुष्टात आणले जातील.
भैरमगड परिसरात जिल्हा राखीव रक्षक दलानी (DRG) कडक सुरक्षा व्यवस्था उभारली होती. याठिकाणी वरिष्ठ अधिकारी देखील तैनात होते. रूपेश याने एप्रिलमध्ये शांतता प्रक्रियेच्या समर्थनार्थ निवेदनही दिले होते, जे माओवादी संघटनेतील अंतर्गत मतभेदांचे कारण मानले जात आहे.
राज्यात नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत २०२५ हे वर्ष निर्णायक ठरले आहे. ८ प्रमुख माओवादी नेते चकमकीत ठार, ८३६ अटक, आणि एकूण १,६३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आत्मसमर्पणाचा टप्पा ठरतो.
उपमुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले की, "शांततेच्या दिशेने प्रत्येक आत्मसमर्पण हे एक सकारात्मक पाऊल आहे. बस्तरच्या जनतेने आता लाल हिंसेचा मार्ग साफ नाकारला आहे." सरकार आता आत्मसमर्पित माओवादी कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनावर भर देणार आहे.