
बदलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत शुक्रवार ते रविवारपर्यंत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा स्वामी भक्तांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. या तीन दिवसांत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास सेवा पुढेही सुरु ठेवता येईल असे सांगण्यात आले आहे.
बदलापूर आणि परिसरातून स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जातात. बदलापूरवरून थेट सेवा नसल्याने तसेच रेल्वे आरक्षण बहुतेकवेळा मिळत नसल्याने बहुतांश ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलांना अडचणी येत होत्या मात्र सध्या तरी ही अडचण दूर झाल्याने स्वामी भक्तानी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 'आवडेल तेथे प्रवास' ही सवलत योजना सुरु असून बदलापूर बस स्थानकातसुध्दा ही सेवा राबविली जात आहे.