
दुबई: शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या आशिया कपच्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध बाजी मारली. तिलक वर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने आशिया कप उंचावला आहे. आशिया कपमध्ये भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले. तिलक वर्मा या विजयाचा हिरो ठरला. भारताने पाकिस्तानचे आव्हान १९.४ षटकांत पूर्ण केले. भारताने नवव्यांदा आशिया कपचा खिताब जिंकला.
पाकिस्तानचे १४७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच षटकांत त्यांना पहिला धक्का बसला तो अभिषेक शर्माच्या रूपात. संपूर्ण आशिया कपमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अभिषेकला या सामन्यात केवळ ५ धावा करता आल्या. त्यानंतर लगेचच सूर्यकुमार यादव अवघ्या १ धावेवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिललाही जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याने १२ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने खेळी सावरण्याचा प्रयत्न केला. भारताचा डाव सावरलेला असतानाच संजू सॅमसन २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि शिवम दुबेने खेळी सावरली. एकीकडे तिलक वर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्माच्या शानदार नाबाद ६९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचे आव्हान १९.४ षटकांत पूर्ण केले
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत १४६ धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून सलामीवीर साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
वरुण चक्रवर्तीने साहिबजादा फरहानला बाद करून भारताला पहिली विकेट मिळवून दिली. साहिबजादा आणि फखर जमान यांनी पाकिस्तानला पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली होती. पण वरुणने साहिबजादाला बाद करून ही भागीदारी मोडली. ज्यामुळे भारताला सुटकेचा निश्वास सोडला. साहिबजादाने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. कुलदीप यादवने साईम अयुबला बाद करून पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बुमराहने त्याचा कॅच पकडला. अयुब ११ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. ज्यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. पाकिस्तानची तिसरी विकेट अक्षर पटेलने घेतली. भारतासाठी चौथी विकेट वरुण चक्रवर्तीने घेतली. फखर चांगली फलंदाजी करत होता आणि अर्धशतक झळकावण्याच्या जवळ होता. पण वरुणने त्याला कुलदीपकडे कॅच द्यायला भाग पाडलं. फखर ३५ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला.
हुसेन तलतला बाद करून अक्षर पटेलने पाकिस्तानची पाचवा विकेट घेतली. पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि पाकिस्तानला अडचणीत आणले.कर्णधार सलमान आघाला बाद करून कुलदीप यादवने पाकिस्तानची सहावा विकेट घेतली. सलमान ७ चेंडूत आठ धावा करून बाद झाला.कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला सातवा धक्का दिला. शाहीन आफ्रिदी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. कुलदीपची ही सामन्यातील तिसरी विकेट होती. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. कुलदीपने फहीम अशरफला बाद करून सामन्यातील चौथी विकेट घेतली. अशरफला त्याचे खातेही उघडता आले नाही. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हरिस रौफला बाद करून पाकिस्तानला नववा धक्का दिला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 146 धावांवर बाद झाला.