मुंबई: कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसरात घडलेल्या वृक्ष दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप होत असून, एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम (MLA Amit Satam) यांनी केली आहे. वृक्षछाटणीतील निष्काळजीपणा आणि वेळेत न झालेल्या कारवाईमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार साटम (MLA Amit Satam) यांनी म्हटले की, संबंधित सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच, यापूर्वी मॅनहोल दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणातही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती, तरीही पुन्हा गंभीर घटना घडल्याने त्यांची भूमिका अधिक संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/07/05/tree-collapse-in-mumbai-mumbai-hit-by-strong-winds-142-incidents-of-trees-or-branches-falling-2-tragic-deaths/
१७ ठिकाणांची यादी देऊनही दुर्लक्ष :
बीएमसीच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी मे २०२६ मध्ये त्यांच्या वॉर्ड क्रमांक १६४ मधील १७ धोकादायक ठिकाणांची यादी देत संबंधित ठिकाणी तातडीने वृक्षछाटणी करण्याची मागणी एल विभागाकडे केली होती. या यादीत नौपाडा परिसराचाही स्पष्ट उल्लेख होता. तसेच पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही लेखी स्वरूपात देण्यात आला होता. मात्र वारंवार पत्रव्यवहार आणि स्मरणपत्र देऊनही महापालिकेच्या स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप :
नौपाडा परिसरातील धोकादायक झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी न झाल्यानेच ही दुर्घटना घडली, असे आमदार साटम यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
https://prahaar.in/2026/07/05/mayor-ritu-tawde-mayor-swings-into-action-following-the-tree-related-tragedy-in-kurla-%e2%82%b95-lakh-aid-for-the-deceaseds-family-orders-issued-for-an-urgent-tree-audit-in-mumbai/
वैज्ञानिक वृक्ष व्यवस्थापनाची गरज :
या पार्श्वभूमीवर मुंबईतील वृक्ष व्यवस्थापन आणि छाटणी प्रक्रियेत वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरजही आमदार साटम (MLA Amit Satam) यांनी अधोरेखित केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन पातळीवर न राहता प्रत्यक्ष स्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.