Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेआता सर्पदंश झाल्यास आरोग्य केंद्रातच मिळणार त्वरित उपचार

आता सर्पदंश झाल्यास आरोग्य केंद्रातच मिळणार त्वरित उपचार

कर्मचाऱ्यांना देणार सर्पदंश उपचाराचे प्रशिक्षण

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील गाव, वाड्या-पाड्यांवर असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये सर्प दंशावर योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाला शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यादरम्यान, त्याचा वाटेतच मृत्यू ओढवतो. अनेक वेळा प्रशिक्षित कर्मचारी आरोग्य केंद्रात नसल्याने रुग्णाला उपचारासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवावा लागतो.

मात्र आता ही वेळ यापुढे येणार नसून तालुक्यातील आरोग्य केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सर्पदंश झालेल्या रुग्णाला तत्काळ उपचारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आरोग्य विभागाने गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्प दंशाची आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषध, गोळ्यांचा पुरेसा साठा देऊन, या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्येक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा, प्रशिक्षित मनुष्यबळ आहे की नाही याची चाचपणी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तालुक्यांमधील आरोग्य केंद्रांचा या सेवांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षात शहापुरात ५०५ ग्रामस्थांना सर्प दंश झाला. २२४ जणांना विंचवाने दंश केला होता. या दंशांनी एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाची इंजेक्शन उपलब्ध असतात. तेथेच दंश झालेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित असते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -