आमदार नितेश राणे यांचा विश्वास
मुंबई : उबाठा गटाचे अधिवेशन नाशिकमध्ये २२ आणि २३ जानेवारीला होणार आहे. या अधिवेशनाची आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडविली. खरे म्हटले तर ही एक श्रद्धांजली सभा असून, मातम मनविण्यासाठी हे सर्व एकत्र येत आहेत. या मातम सभेकडे वा श्रद्धांजली सभेकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही, असा ठाम विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले की, उबाठा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघटनेचा पोपट मेलेला आहे. निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी देखील शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे जाहीर करून टाकले आहे. आता जी संघटना जिवंत नाही, ज्याचे अस्तित्व नाही. ज्याचे चिन्ह मशाल राहील की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे राणे म्हणाले.
दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन हे लोक नेमके कोणाला खुश करू पाहत आहेत?, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. तसेच या दोन दिवसांच्या अधिवेशनाला कोणीही ढुंकून देखील पाहणार नसल्याचेही राणे म्हणाले. भारतीय जनता पार्टी, आमचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शिव्या देण्यापलिकडे उबाठाकडे काही विचार नाहीत, ना उबाठा गटाच्या नेत्यांकडे काही विचार आहेत, असे राणे म्हणाले.