Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता!

नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता!

अमृता फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर : अमृता फडणवीस आपल्या बिनधास्त बोलण्यामुळे कायम चर्चेत येत असतात. अनेकदा त्यांच्या या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली. न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये एका अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख पुन्हा एकदा राष्ट्रपिता म्हणून केला. अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. त्याच दिवशी तुम्ही त्यांना राष्ट्रपिता आहे, असे म्हणालात. माझा आरोप असा आहे की, मोदीजी जर राष्ट्रपिता आहेत, तर महात्मा गांधी कोण आहेत? त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, की महात्मा गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे माझे ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत. हे नवीन भारताचे आणि ते तेव्हाचे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी यापूर्वीही अनेक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्या चर्चेतही होत्या. आता त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -