मुंबई (हिं.स.) : महाराष्ट्राचा उल्लेख नेहमी देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य असा केला जातो. परंतु महाराष्ट्राची ओळख इतकी मर्यादित नसून महाराष्ट्र ही त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या संतांची पवित्र भूमी; शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यांची जन्मभूमी तसेच अनेक समाजसुधारकांची कर्मभूमी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे राज्यातील या वर्षीच्या पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्तींचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान, आरोग्यसेवा, कला, क्रीडा, शौर्य या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आज देश झपाट्याने प्रगती करीत असून कर्तृत्ववान व्यक्तींमुळे राज्याची घोडदौड कायम राहील, असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्र ही प्रतिभावंत लोकांची खाण असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे राज्याच्या विकासात योगदान फार मोठे होते. त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते असे नमूद केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. हिम्मतराव बावस्कर, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. अनिल राजवंशी व डॉ. भीमसेन सिंघल यांचा तसेच राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते कु. शिवांगी काळे, जुई केसकर व स्वयम विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. गायिका सुलोचना चव्हाण अनुपस्थित असल्यामुळे त्यांचा सत्कार त्यांच्या नातवाने स्वीकारला.