एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ६०० कोटींची रक्कम सरकारकडून थकीत
मुंबई : एसटी बसमध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. एसटी बसमध्ये एकूण २९ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सवलतीच्या संपूर्ण रक्कमेची प्रतिपूर्ती सरकार करीत असून साधारण वर्षाला १६०० कोटी रुपये इतकी रक्कम सरकार महामंडळाला अनेक वर्षे देत आहे. परंतू महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आतापर्यंत सरकारने यातील एकही पैसा दिला नसून एसटी सक्षम करण्याच्या निव्वळ गप्पा मारल्या जात आहेत, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. सदरची रक्कम देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून एसटी सक्षम करण्याच्या पोकळ घोषणा करीत असल्याचे आरोप बरगे यांनी म्हटले आहे.
एसटी बसमध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. त्यामध्ये मुख्यत्वे करून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व साथीदार, ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अपंग, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व साथीदार, सिकल सेल, डायलेसिस रुग्ण अशा काहींना संपूर्ण मोफत प्रवास तर काहीना ५० टक्के सवलत प्रवाशी भाड्यात दिली जाते. एसटी बसमध्ये एकूण २९ प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्याची प्रतीपूर्तीची रक्कम सरकार वर्षानुवर्षे करीत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम थकली असून सन २०२१ व सन २०२२ मधील एकूण ३८९ कोटी येणे बाकी आहे. तर आत्तापर्यंतची एकूण अंदाजे ६०० कोटी रुपयांची रक्कम सरकारकडे थकीत आहे, असेही बरगे यांनी म्हटले आहे.