मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेत महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी केसरकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना नागरी सेवा-सुविधा पुरवतेच. महानगरपालिका प्रशासनात अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळ आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही कौशल्याची कमतरता नाही. या सर्वांची सांगड घालून मुंबई महानगराच्या विकासासाठी जे-जे नावीण्यपूर्ण, आधुनिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या कल्याणाशी जोडलेले उपक्रम राबवता येतील, ते हाती घेण्याचा मानस आहे.
अरुंद व दाटीवाटीच्या वस्तींमध्ये राहणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, इतर वंचित घटक या सर्वांना मुंबई महानगरामध्ये योग्य स्थान मिळावे म्हणून शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य या क्षेत्रांसह इतरही आवश्यक त्या सर्व क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ होण्यासाठी महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामध्ये दुवा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन, असेही पालकमंत्री केसरकर यांनी केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
दरम्यान यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेची संक्षिप्त ओळख करून दिली. त्यानंतर सर्व अतिरिक्त आयुक्तांनी क्रमाक्रमाने संगणकीय सादरीकरण करून कामकाजाची माहिती पालकमंत्र्यांना करून दिली.