मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?” अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
मी सुद्धा जिवंत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न
आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांचे वक्तव्य मी सुद्धा जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न असून त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व देणे गरजचेचे नसल्याचे म्हटले आहे.
संजय राऊतांनी उंची पाहुन बोलावे
संजय राऊत यांच्यावरही आशिष शेलार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले संजय राऊत यांनी उंची पाहुन बोलावे. त्याचबरोबर त्यांनी डोकेसुद्धा चेक करून घ्यावे.