सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीवर भारताने निर्विवाद पकड मिळवली आहे. विशेष म्हणजे कसोटीचा दुसरा दिवस हा पावसामुळे वाया गेल्याने निराश झालेल्या क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी मात्र आपल्या जबरदस्त कामगिरीने खुश केले आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात फक्त १९७ धावा करू शकला आणि भारताने या डावात १३० धावांची आघाडी घेतली होती. सेंच्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. भारताकडून विकेटकीपर ऋषभ पंत आणि अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद शमी यांनी इतिहास घडवला. पंतने विकेटकीपर म्हणून भारताकडून सर्वाधिक वेगाने १०० विकेट घेतल्या. तर शमीने कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट पूर्ण केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात तिसरा कॅच पकडून पंत याने सर्वात वेगाने १०० विकेट पार करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. पंतने फक्त २६ कसोटींमध्ये ही कामगिरी केली आहे. याआधी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने ३० कसोटीत ही कामगिरी केली होती. पंतने हा विक्रम फक्त वयाच्या २४व्या वर्षी केला. या क्रमवारीत वृद्धिमान साहा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३९ कसोटीत ही कामगिरी केली.
जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याने पहिल्या डावात ५ विकेट घेत कसोटीतील २०० विकेटचा टप्पा पार केला आहे. भारताकडून कसोटीत २०० विकेट घेणारा तो ११वा गोलंदाज ठरला आहे. तर जलद गोलंदाजांमध्ये तो पाचवा आहे. भारताकडून सर्वात वेगाने २०० विकेट घेणाऱ्या यादीत तो कपिल देव (५० कसोटी) आणि जवागल श्रीनाथ (५४ कसोटी) यांच्यानंतर तिसरा जलद गोलंदाज ठरला आहे. विशेष महणजे शमी याने ५५ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेचा डाव फक्त १९७ धावांमद्ये संपुष्टात आला. भारताने दुसऱ्या डावात १ बाद १६ धावा केल्या आहेत. टीम इंडिया १४६ धावांनी आघाडीवर आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तिसऱ्या दिवशी एकूण १८ विकेट पडल्या आहेत.