Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजस्वच्छतादूत

स्वच्छतादूत

  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

विश्वातील प्रत्येक घटक, प्रत्येक जीव त्याचे एक सत्कर्म घेऊन जन्माला आलेला आहे. त्यातीलच गिधाड हा एक पक्षी. जो या विश्वासाठी खूप मोठं कार्य करीत आहे. गिधाडाचे शरीर एवढे आम्लिय असते की, धातूसुद्धा हे पचवू शकतात. त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून निसर्गाने ही सोय केलेली आहे. खरं तर परमेश्वराने यांची रचना या निसर्गाची सफाई करण्यासाठीच केलेली आहे.

स्वच्छतादूत कोण बरं असेल? असा प्रश्न पडला ना तुम्हाला. आता मी त्या पक्ष्याचे तुम्हाला वर्णन करते. बघा लक्षात येतोय का? खूप मोठा अजस्त्र पण गलिच्छ वाटणारा ओंगळ असा एक पक्षी. ज्याच्या तोंडाला रक्त लागलं आहे आणि जो मृत प्राण्यांवर उभा आहे. तो प्राणी किंवा पक्षी खात आहे आणि मग मनात उगीचच भीती वाटते अन् आपल्या नजरेसमोर लगेच गिधाड येते.

या विश्वातील प्रत्येक घटक प्रत्येक जीव त्याचे एक सत्कर्म घेऊन जन्माला आलेला आहे. त्यातीलच हा एक पक्षी. जो या विश्वासाठी खूप मोठं कार्य करीत आहे. याचा तर कोणाच्या मनात सकारात्मकपणे विचारही येत नाही. याच कार्यासाठी परमेश्वराने याची निर्मिती केली आहे.

प्राचीन काळी एकाच प्रजातीचे जे पक्षी होते, त्यामध्ये गिधाड आणि गरुड हे येत होते. म्हणूनच कदाचित जटायू या पक्ष्याला गिधाडही समजत असावेत; परंतु आताच्या काळात वैज्ञानिकांनी या पक्ष्यांना वेगळे केले आणि गिधाडाबरोबर सारस आणि बगळा यांच्या जवळच्या प्रजातीमध्ये सामील केले. पण परत त्यानंतर गिधाडांना स्वतंत्र प्रजातीमध्ये सामील केले. गरुड आणि गिधाड या पक्ष्यांमध्ये असलेल्या संभ्रमाबद्दल आधीच्या लेखात याबद्दल बोललेच आहे. दोघांच्याही वर्णनात थोडे साम्य असले तरी काही काही गोष्टी विजोड आहेत. याचाच अर्थ दोन्ही पक्ष्यांचे मिश्रण म्हणजेच जटायू होता. दोन गोष्टींमुळे अजून संभ्रम आहे की, गिधाड आकाशात सर्वात उंच उडते आणि आक्रमक असते. दुसरी गोष्ट लांबून जर गिधाडांना पाहिले, तर त्यांचा चेहरा राक्षसासारखा वाटतो. यामुळेच बहुतेक जटायू म्हणून गिधाड संबोधित असावेत.

गिधाड हा शिकारी आणि मांसाहारी पक्षी आहे. आताच्या काळात जास्तीत जास्त एकूण पंखांचा दहा फुटांपर्यंत दिसणारा पसारा या गिधाडांचा असतो. हे पक्षी झुंडीत राहतात. मृत शरीरावर बसून झुंडीने त्यांचे भोजन करणाऱ्या गिधाडांना ‘वेक’ असे म्हणतात. आकाशात उडणाऱ्या गिधाडांच्या झुंडीला “कॅटल” असे म्हणतात. हे नेहमी झुंडीनेच राहतात. याचे कारण असे असते की, जेव्हा मृत शरीर जंगलात असते, तेव्हा ते खाण्यासाठी अनेक पशू तिथे येत असतात. जर हे झुंडीने राहिले, तर हे त्यांच्यावर हावी होऊ शकतात. एकांतात फक्त गरुड राहतो. त्याला झुंडीची आवश्यकता नसते. जर गिधाडे झुंडीने राहत असतील, तर एकटे गिधाड जटायू कसे असू शकतील? ते इतके आक्रमक असतात की, अन्नासाठी एकमेकांशीसुद्धा खूप भांडतात. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया सोडून जगात सगळीकडे गिधाडे आढळतात. अमेरिका, एशिया, युरोप, आफ्रिका येथे गिधाडे आढळून येतात. जवळजवळ २३ प्रजाती यांच्या आहेत. यांचे आयुर्मान ३७ ते ४० वर्षे असते आणि चार ते सहा वर्षांत ते प्रजननासाठी तयार होतात. गिधाडांमध्ये नर आणि मादी लवकर ओळखता येत नाही. यांचे स्थान उंच झाडावर, जमिनीवर, पहाडांवर असते. गिधाड हा जगातील सर्वात उंच आकाशात उडणारा पक्षी आहे. यांची नजर आणि घ्रानेंद्रिये ही तीक्ष्ण असतात. शहरात आपल्याला गिधाडे कधीच दिसत नाहीत. कारण ते जंगलातच राहतात. साधारणपणे गिधाड तपकिरी काळपट पंखांचा, वजनदार, मजबूत, तीक्ष्ण दृष्टी, मजबूत बाकदार चोच, उंच धिप्पाड असतात. डोक्यापासून मानेपर्यंत पंखविरहित वाटतात. पण बारीकशी पंखांची लव असते. यांची मान बारीक आणि लांबट असते. त्याची पिसरहित मान थंडीमध्ये खाली वाकून आपल्या उबेसाठी ते स्वतःच्या पंखाच्या शरीरात झाकून घेण्याचा प्रयत्न करतात. याच्या डोक्यावर मानेपर्यंत पिसं नसतात, कारण जेव्हा गिधाडे मृत प्राण्याला खातात, तेव्हा मृत प्राण्याच्या शवामध्ये ते पूर्णपणे डोके आत टाकतात. जंगलामध्ये मोठ-मोठ्या मृत प्राण्यांचे शरीराचे विघटन होत नाही. बऱ्याचदा मृत प्राण्याचे शव सडलेलेसुद्धा असते, त्यांच्या अंगावर खूप किटाणू असतात. त्यामुळेच गिधाडाचे शरीर एवढे आम्लिय असते की, धातूसुद्धा हे पचवू शकतात. त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून निसर्गाने ही सोय केलेली आहे. त्यांच्या शरीरात असणारे पाचक बॅक्टेरिया, टॉक्सिक खूप ताकदवर असतात, त्यामुळे सर्व हाडे, किटाणू हे पक्षी पचवू शकतात. जेव्हा वातावरणात उष्णतेचे प्रमाण जास्त असते, तेव्हा कोणत्याही मृत जीवावर जीवाणू लवकर वाढतात आणि जंगलात रोगराई वाढू शकते. या मृत प्राण्यांची वेळीच विल्हेवाट लावल्यामुळे रोगराई होण्यास प्रतिबंध होतो. स्वच्छता राखली जाऊन नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहते. या निसर्गातील हे एक मात्र कर्तव्यनिष्ठ सफाईकर्मी आहेत. खरं तर परमेश्वराने यांची रचना या निसर्गाची सफाई करण्यासाठीच केलेली आहे. निसर्ग स्वच्छतासारखे मोठे कार्य फक्त आणि फक्त हेच पक्षी करतात. म्हणूनच त्यांना मी परमेश्वराने या विश्वात पाठवलेले हे “स्वच्छतादूत” आहेत असं म्हणते. कारण वनामध्ये तर ही स्वच्छता करण्यासाठी कोणीही दुसरे येणार नाही. नैसर्गिकरीत्या मोठ्या प्राण्यांचे विघटन होण्यास वेळ लागेल म्हणून यांचे शरीर नैसर्गिकरीत्या सशक्त केले आहे. यांची पाचक शक्ती खूप सुदृढ आहे, त्यामुळे ते आजारीसुद्धा पडत नाहीत. टर्कीतील गिधाडे आपल्या पायांवर मूत्रविसर्जन करतात. बघा ना, निसर्गाची किमया ती काय म्हणावी? त्यांच्या पायांना मृत प्राण्यांचा संसर्ग होऊ नये म्हणूनच या ब्रह्मांडातील शक्तीने केलेली ही तजवीज. लघवीतील यूरिक ॲसिडमुळे त्या मृत शवांवरील बॅक्टेरियासुद्धा मरतात. अन्नाच्या शोधार्थ हे पक्षी आकाशात खूप उंच घिरट्या घालत असतात. म्हणूनच जगातील सर्वात आकाशात उंच उडणारे पक्षी म्हणून यांची नोंद झाली आहे.

मध्यंतरी भारत आणि नेपाळमध्ये या पक्ष्यांची संख्या खूपच कमी झाली आणि त्याचे कारण होते पशूंच्या शरीरातील डाइक्लोफेनाक औषध. खरं तर गिधाड २००० पासूनच विलुप्त झालीत. त्याची कारणे रासायनिक खते. ज्यामुळे अन्न-धान्य, खाल्लेले पशूपक्षी विषारी होतात आणि तेच मृत पशू-पक्षी गिधाडे खातात. बऱ्याचदा अनेक पशू-पक्ष्यांना मानवी शिकारी हे विष देत असतात आणि त्याच विषारी मृत पशू-पक्ष्यांना खाऊन गिधाडेसुद्धा मरत असतात. यासाठी सरकारने कुठेतरी कडक कायदे, निर्बंध करावयास हवेत. प्रदूषण, वृक्षतोड अशी अनेक कारणे आहेतच. गिधाडे जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही गिधाडे वन संरक्षकाच्या रूपातही खूप मोठे कार्य करीत असतात. प्राचीन मिस्त्र कलेमध्ये गिधाडांना शहर संरक्षकाच्या रूपात चित्रीत केलेले आहे. राजघराण्यातील स्त्रिया गिधाडांचे मुकुट धारण करीत असत, तर देवी नेखबेट हिच्या सुरक्षेचे प्रतीक म्हणजे गिधाड होते. प्राचीन मिस्त्रवासी यांचे म्हणणे होते की, गिधाडामध्ये नर नसतो. सर्व गिधाडे या मादी असतात आणि त्या नराशिवाय अंडी देतात. त्यामुळे यांना पवित्रता आणि मातृत्व याबरोबर जोडलेले आहे. पूर्व कोलंबियामध्ये गिधाडांना असाधारण आणि उच्च प्रतीकात्मक दर्जाचे पक्षी म्हणून संबोधले आहे. काही नकारात्मक, तर काही सकारात्मकपणे त्यांना चित्रित केले जाते.

हे विश्व खूप सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य अजून वाढावे, या जीवसृष्टीच्या जीवनासाठी परमेश्वराने जी पंचतत्वाची योजना केली आहे त्या योजनेत सहभाग व्हावा, त्याचे संवर्धन व्हावे आणि ही पृथ्वी टिकून राहावी यासाठी परिपूर्ण अशा मानवाची निर्मिती परमेश्वराने केली; परंतु आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कायमच चुकीच्या मार्गाने जात आहोत. या जीवसृष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रांचा विचार करून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन आपणही करायला हवे.

dr.mahalaxmiwankhedkar@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -