देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा आरोप
कोण संजय राऊत? माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा!; राऊतांना लगावला टोला
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) लढत असली तरी देशभरात ही लढत मुख्यत्वे भाजपा आणि काँग्रेस पक्षात (BJP VS Congress) आहे. त्यातच काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. या निवडणुकीत भाजपा निवडून आल्यास संविधान धोक्यात येईल, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला’, असा मोठा आरोप त्यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसला चपराक लगावली.
संविधान धोक्यात येण्याच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गेल्या १० वर्षांपासून मोदींकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्यांनी संविधानाचं रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचारही केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की संविधानाची मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. जेव्हा विकास, जनहिताचं काम करता येत नाही, विश्वासार्हता संपलेली असते तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीसांनी देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यावर टीका केली. “संविधान धोक्यात येणार हा दावा करणं मूर्खपणाचं आहे. भारताच्या रक्तात लोकशाही आहे. भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता. त्यांनी विरोधी पक्षांच्या लाखो नेते-कार्यकर्त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवलं. त्यानंतरही त्यांना भारतातली लोकशाही संपवता आली नाही. भारतातली लोकशाही कुणीच संपवू शकत नाही”, असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेस कधीही दिलेलं आश्वासन पूर्ण करत नाही
राहुल गांधीवरही देवेंद्र फडणवीसांनी जोरदार निशाणा साधला. ‘सत्तेत आल्यास अग्नीवीर योजना रद्द करू’, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, “माझं काँग्रेसला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, कर्नाटक या कुठल्याच ठिकाणी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे त्यांना माहिती आहे की ते निवडूनच येणार नाहीत. त्यामुळे उद्या राहुल गांधी हे आश्वासनही देऊ शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताज महाल बांधून देईन”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
संजय राऊतांचं पत्र आणि फडणवीसांची टीका
संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून श्रीकांत शिंदेंच्या संस्थेत सामाजिक कार्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये चौकशी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. या पत्रावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली. “कोण संजय राऊत? तुम्ही दर्जा असणाऱ्या लोकांबद्दल प्रश्न विचारा. माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.