Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वउद्योगविश्वात तेजीही आणि फसवणूकही...

उद्योगविश्वात तेजीही आणि फसवणूकही…

अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

नजीकच्या भविष्यकाळात टाटा समूह इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांचे उत्पादन करणार असून अॅप्पल फोन्सच्या निर्मितीमध्ये ‘फॉक्सकॉन’ला टक्कर देणार आहे. दुसरीकडे उत्तर भारतात मे महिन्यात पाऊस आणि ढग वाढल्यामुळे हवेत उष्मा कमी राहून लोकांनी एसी, कूलर, फ्रिज खरेदीचा बेत पुढे ढकलला. या काळात उद्योगविश्वात मरगळ कमी पाहायला मिळत असताना दिवाळखोरीच्या घटना मात्र वाढल्याचे दिसून आले आहे.

सरत्या आठवड्यामध्ये उद्योगजगतात भरपूर घडामोडी बघायला मिळाल्या. त्यामधून देशातले झटपट उद्योगचित्र पहायला मिळाले. एक मात्र खरे की, अर्थक्षेत्रात मरगळ कमी पहायला मिळत असून अनेक उद्योग सातत्याने विस्ताराच्या योजना आखत आहेत. अर्थात असे असूनही या क्षेत्रातल्या दिवाळखोरीच्या घटना लक्षवेधी असून बेरोजगारी कमी होण्याची प्रतीक्षा राहणार आहे. येत्या काळात टाटा समूह इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांचे उत्पादन करणार असून दुसरीकडे ‘फॉक्सकॉन’ला टक्कर देण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे उत्तर भारतात मे महिन्यात पाऊस आणि ढग वाढल्यामुळे हवेत उष्मा कमी राहून लोकांनी एसी, कूलर, फ्रिज खरेदीचा बेत पुढे ढकलला.

टाटा समूह गुजरातमध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या समूहाने गुजरात सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत राज्यात लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग गीगा कारखाना उभारणार आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या ‘अग्रतास एनर्जी स्टोअरेज सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ने गुजरात सरकारबरोबर हा करार केला आहे. प्रस्तावित गीगा कारखाना हा भारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना असेल. पहिल्या टप्प्यात २० गीगावॉटची उत्पादन क्षमता आणि सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह कंपनी इथे निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. या सामंजस्य करारावर ‘अग्रतास एनर्जी स्टोअरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे सीईओ विजय नेहरा आणि गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिवांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. टाटा समूहाने हा प्रकल्प सुरू केल्याने गुजरात हे लिथियम-आयन सेल उत्पादनात आघाडीचे राज्य म्हणून स्थापित होईल आणि राज्यातील बॅटरी उत्पादनाच्या विकासाला हातभार लावेल. या गीगा कारखान्याच्या स्थापनेने २०३० पर्यंत देशात ५० टक्के कार्बन उत्सर्जन मुक्त ऊर्जा आणि १०० टक्के इलेक्ट्रिक वाहन वापराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुजरातला एक नवी दिशा दिली आहे. दरम्यान, हा प्रकल्प इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि १३ हजारांहून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असे म्हटले जात आहे.

टाटा समूहाने आणखी एका क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्याची तयारी पूर्ण केली आहे. समूहाने आपल्या नवीन व्यवसायासाठी ७,६०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. टाटा समूह आता फॉक्सकॉनसारख्या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी करत आहे. एका अहवालानुसार, नवीन फंड कंपनी रजिस्ट्रार (आरओसी)कडे केलेल्या फाइलिंगमधून उघड झाला आहे. टाटा समूहाने काही काळापूर्वी टाटा इलेक्ट्रॉनिक्स नावाची नवीन कंपनी सुरू करून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात प्रवेश केला. टाटा इलेक्ट्रॉनिक्सला २०२२-२३ दरम्यान होल्डिंग कंपनी टाटा सन्सकडून ६०८ कोटी रुपयांचे भांडवल मिळाले. कंपनी सुरू झाल्यानंतर तीन वर्षांमध्ये १,८२० कोटी रुपयांचे भांडवल मिळाले आहे. ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’ ही टाटा समूहातली नवी कंपनी आहे.

टाटा समूहाने इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी या कंपनीची स्थापना केली आहे. टाटा समूह तैवानमधील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपन्यांपैकी एक असलेल्या विस्ट्रॉनचा प्लांट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. विस्ट्रॉनचा संबंधित प्लांट बंगळुरुजवळ आहे आणि या प्लांटमध्ये अॅपलसाठी आयफोनसह इतर अनेक उत्पादने बनवली जातात. टाटा समूह टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील फॉक्सकॉन आणि डिक्सनसार‘या दिग्गजांशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. ‘विस्ट्रॉन’चा प्लांट ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’च्या माध्यमातून खरेदी केला जाईल. ही कंपनी तामिळनाडूमध्ये आधीच नवीन प्लांट बांधत आहे. तामिळनाडूमध्ये बांधण्यात येत असलेला टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा नवा प्लांट मोबाइल निर्मितीसाठी आहे. त्याच वेळी, विस्ट्रॉनचा प्लांट ताब्यात घेतल्यानंतर, टाटा इलेक्ट्रॉनिक्स अॅपलसाठी आयफोन तयार करणारी पहिली भारतीय कंपनी बनेल.

उत्तर भारतात यंदा थंड उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांचा उन्हाळी हंगाम हा अवकाळी पावसाचा बळी ठरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुहेरी अंकवाढीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांच्या विक्रीत ३५-४० टक्के घट झाली. मार्च, एप्रिलनंतर मे महिन्यात पाऊस आणि ढगांमुळे उष्मा नेहमीपेक्षा कमी होता. त्यामुळे बहुतांश लोकांनी एसी, कूलर, फ्रिज खरेदीचा बेत पुढे ढकलला. आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स यासारख्या उत्पादनांचीही विक्री घटली. या काळात लोकांना टाल्कम पावडर, कोल्ड ऑइलसारखे पदार्थ वापरण्याची गरज पडली नाही. किरकोळ विक्री ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म ‘बिझोम’च्या मते, मार्च ते मे दरम्यान शीतपेयांच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. आईस्क्रीमच्या विक्रीमध्ये ३८ टक्के तर साबणाच्या विक्रीमध्ये आठ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. अनेक कूलिंग कंपन्यांनी उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला. उद्योगाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनानंतर हा उन्हाळा सर्वात कमजोर राहिला. ‘इमामी’चे उपाध्यक्ष मोहन गोयंका यांच्या मते ग्रामीण भागात झालेली किंचित चांगली विक्री वगळता या वर्षी बहुतांश उन्हाळी उत्पादनांची विक्री ढासळली. एसी आणि रेफ्रिजरेटरच्या विक्रीमध्ये ३०-४० टक्के घट झाली. दरम्यान, देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उड्डाणे वाढवण्याची योजना आखल्याचे दिसून आले. या आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२४ पर्यंत कंपन्या आपल्या ताफ्यात सुमारे ११५ विमाने समाविष्ट करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -