मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना काळात वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम मशीन्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला कोरोना प्रादूर्भाव आणि वाढती रेल्वे प्रवासीसंख्या या पार्श्वभूमीवर पुन्हा रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशॅन्स प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या.
दरम्यान, तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच जलद सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई विभागाच्या स्थानकातील एटीव्हीएम मशॅन्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवरील स्थानकात आणखी येत्या काही दिवसांत २६३ नवीन एटीव्हीएम बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सर्व एटीव्हीएम मशीन्स कोरोना काळात दोन वर्षांहून अधिक काळ बंद आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने या यंत्रणा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. सर्वाधिक प्रवासी संख्या असणाऱ्या चर्चगेट ते डहाणूपर्यंत स्थानकांवरील जवळपास ११३ नव्या एटीव्हीएम मशीन्स बसवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयात प्रस्ताव मंजुरीसाठी असल्याची माहिती देण्यात आली. लवकरच यावर अंतिम निर्णय होऊन एटीव्हीएम टप्प्याटप्प्यात बसविले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.