मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. या संबंधात आज विधानसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की मेटे यांच्या चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील माडप बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५२ वर्षीय मेटे ठार झाले आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते बीड येथून मुंबईला येत होते. मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत कॉंग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला फडणवीस यांनी सोमवारी उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, ड्रायव्हरने लेन बदलली आणि मधल्या लेनमध्ये एका जड व्यावसायिक वाहनाला डावीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. डाव्या लेनमध्ये आधीच दुसरे अवजड वाहन होते आणि त्याला ओव्हरटेक करण्यासाठी जागा नव्हती. हा ड्रायव्हरचा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या मेटे यांच्यावर अपघाताचा धक्का बसला. वाहनाच्या चालकाच्या बाजूस अपघाताचा कोणताही परिणाम किंवा नुकसान झाले नाही, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.