मंत्रालयात जाऊन अजितदादांची घेतली भेट
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे त्यांच्या वृक्षप्रेमामुळे सर्वांना सुपरिचित आहेत. सह्याद्री येथील देवराई त्यांनी मोठ्या कष्टाने फुलवली आहे. मात्र राज्याच्या वनविभागाकडे (Forest Department) असलेल्या हजारो हेक्टर जमिनावर वृक्षसंवर्धन (Tree Conservation) होत नसल्याच्या बाबीवरुन ते नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राज्य वनविभागाच्या जमिनीवर केवळ वृक्षसंवर्धनाचे बोर्ड लावले जातात मात्र जागा रिकामी पडून आहे, अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. पण याचवेळी याकरता एक उपक्रमदेखील सुचवला.
सयाजी शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्याशी बोलताना एक नवीन संकल्पना मांडली. ‘वृक्ष प्रसाद योजना’ असं या उपक्रमाचं नाव आहे. आपण सिद्धीविनायक, महालक्ष्मी दर्शनाला जातो. त्यावेळी अभिषेक करतो. तेव्हा जे झाड देवाला आवडतं ते भेट देण्यात येईल आणि त्याचं संवर्धन होईल. त्यामुळे हा उपक्रम सुरु करण्याची मागणी केल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं.
सयाजी शिंदे यांची नाराजी
माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत आम्हाला कसलाही फायदा नको आहे. बायोडायव्हर्सिटीचे (Biodiversity) केवळ बोर्ड लागलेले आहेत. त्यात आम्हांला पडायचं नाही आहे. परंतु आम्ही जे करतो त्याला मदतीची गरज आहे. वनविभाग, महसूल विभागाची मदत मिळते आहे, परंतु काही अधिकारी या टेबलावरुन त्या टेबलावर करतात, त्यामुळे वेळ वाया जातो. त्यांचंही सहकार्य मिळावं, यासाठी अजित पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आज अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचीही भेट होणार होती. परंतु ते जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra