मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६ जणांचा समावेश आहे. देश हळहळतोय, संतापतोय… आणि इथे काही नेते त्या जखमांवर राजकारणाचे मीठ चोळायला मोकळे झालेत! देशभरात संतापाचा भडका उडला आहे. तरीही महाराष्ट्रात काही नेते या दु:खावर राजकारण करत आहेत. याला काय म्हणायचे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट घणाघात केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, “दहशतवाद्यांना कुठे धर्म विचारायला वेळ असतो?” हे म्हणजे ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या नातेवाईकांच्या व्यथेवरही अविश्वास? कुठे चाललेय राजकारण?
यावर फडणवीस संतापून म्हणाले, “तिथे वडेट्टीवार नव्हते! मग नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळून मुंबईत कमेंट करण्याचा अधिकार यांना कुठून येतो? प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं सत्य आणि नातेवाईकांचं थेट सांगणं यालाही हे नेते नाकारतात! तर हे फक्त मूर्खपणाच नाही, तर ही क्रूर असंवेदनशीलता आहे!”
मुख्यमंत्र्यांनी थेट सवाल केला आहे की, “ज्यांनी जिवंतपणी हत्येचा थरकाप अनुभवला, त्यांच्या सांगण्याला खोटं ठरवणं, हे माणुसकीला शोभतं का? ज्यांनी जवळच्यांचा मृत्यू पाहिला, त्यांचं दुःख खोटं ठरवणं, याहून मोठं पाप दुसरं कोणतं?”
देशावर झालेल्या हल्ल्याला कमी लेखणं, आणि मरणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या भावनांना तुडवणं, हे असंवेदनशीलतेचं नव्हे तर राष्ट्रद्रोहाच्या सीमेला छेद देणारं आहे. देशावर आघात करणाऱ्या घटनेवर राजकीय टीका करताना संवेदनशीलतेचा बळी दिला जातोय का, हे विचार करायची वेळ आली आहे!