Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजविज्ञानवादीनी डॉ. नंदिनी हरिनाथ

विज्ञानवादीनी डॉ. नंदिनी हरिनाथ

पल्लवी अष्टेकर

एक लहान मुलगी आपल्या कुटुंबीयांसह रविवारी बसून स्टार ट्रेक हा काल्पनिक कार्यक्रम उत्सुकतेने पाहायची. त्या मालिकेत एक टीम स्पेसशिप व्हाॅएजरमध्ये बसून ब्रह्मांडाचा शोध घेत फिरायची. वेगवेगळ्या ग्रहांवरची परिस्थिती, तिथले अनुभव, संकटं अशा गोष्टींना तोंड देत पुढे जात राहायचे हीच त्या मालिकेतील संकल्पना. याचा परिणाम म्हणून नंदिनी याबाबत उत्सुक राहिली व त्या दिशेने तिची पावले उचलली गेली. नंदिनीचा जन्म आणि वाढ तामिळनाडूमध्ये झाली. तिची आई गणित शिक्षिका व वडील अभियंता आणि भौतिकशास्र प्रेमी होते. त्यामुळे तिला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड
निर्माण झाली. डाॅ. नंदिनी यांनी भारताच्या पहिल्या आंतरग्रहीय मोहिमेत (Mars Orbitor Mission)- मंगळयान यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मंगळयान मोहिमेत डाॅ. नंदिनी यांनी डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर व प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहिले.

५ नोव्हेंबर २०१३ च्या एका शांत सकाळी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या मिशन कंट्रोल रूममध्ये, डॉ. नंदिनी हरिनाथ आपल्या टीमसोबत संगणक स्क्रीनकडे डोळे लावून बसल्या होत्या. त्यावेळी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. भारताच्या पहिल्या आंतरग्रहीय मोहिमेचा, मंगळयानचा प्रक्षेपण क्षण जवळ आला होता. जर सर्व काही योग्य झाले, तर भारत मंगळावर यशस्वीरीत्या पोहोचणाऱ्या देशांच्या यादीत सामील होणार होता. मात्र हे एक वेगळे आव्हान होते. कारण इतर देशांच्या तुलनेत भारताला हे संपूर्ण मिशन फक्त ७४ दशलक्ष डॉलर (₹ ४५० कोटी रुपये) या कमी बजेटमध्ये पूर्ण करायचे होते. अमेरिकेच्या नासाने (NASA) आणि युरोपच्या अवकाश संस्था (ESA)ने मंगळावर पोहोचण्यासाठी अत्याधुनिक आणि महागड्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता, पण इस्रोकडे तेवढे मोठे बजेट नव्हते. डॉ. नंदिनी हरिनाथ यांच्यासाठी हा क्षण एक विशेष यश होते. त्यांनी इस्रोमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केले होते आणि अनेक उपग्रह प्रक्षेपण मोहिमांमध्ये योगदान दिले होते. पण मंगळयान ही वेगळीच जबाबदारी होती. कारण ही भारताची पहिलीच आंतरग्रहीय मोहीम होती.

मंगळयान मोहिमेसमोरील सर्वात मोठे तांत्रिक आव्हान म्हणजे कमी खर्चात अंतराळयान मंगळावर पाठवणे. अमेरिका आणि युरोपसारख्या महासत्तांनी अत्यंत शक्तिशाली रॉकेट्स वापरून त्यांची याने थेट मंगळाच्या दिशेने पाठवली होती. पण भारताकडे तसे शक्य नव्हते. PSLV-C२५ (Polar Satellite Launch Vehicle) या कमी ताकदीच्या रॉकेटच्या मदतीने, मंगळयान थेट मंगळाकडे पाठवणे अशक्य होते. त्यामुळे, नंदिनी आणि त्यांच्या टीमने स्लिंग शॉट (Gravity Assist) तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या तंत्रानुसार, मंगळयानाला थेट मंगळाकडे सोडण्याऐवजी, आधी पृथ्वीभोवती कक्षा ठरवण्यात आली. पुढील चार आठवड्यांत, इस्रोने ६ वेळा ऑर्बिट-रेझिंग (कक्षा वाढवण्याची) यशस्वी यंत्रणा राबवली, ज्यामुळे यानाची गती हळूहळू वाढत गेली. शेवटी, १ डिसेंबर २०१३ रोजी, “Trans-Martian Injection (TMI)” नावाच्या निर्णायक टप्प्यात, मंगळयानाला शेवटचा वेग वाढवणारा जोर देण्यात आला आणि ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झाले व मंगळाच्या दिशेने प्रवास करू लागले.

६५० दशलक्ष किलोमीटरचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. अंतराळयान ३०० दिवस मंगळाच्या दिशेने प्रवास करत होते आणि या काळात त्याची गती, दिशा आणि स्थिरता यावर बारीक लक्ष ठेवावे लागत होते. या मोहिमेतील एक मोठी अडचण म्हणजे मंगळ आणि पृथ्वी यांच्यातील अंतर. कारण अंतराळयानाला पृथ्वीवरील वैज्ञानिकांकडून दिलेले संदेश १२ मिनिटे उशिराने मिळत होते. याचा अर्थ असा की, जर काही तांत्रिक समस्या आली, तर इस्रोला तत्काळ सुधारणा करणे शक्य नव्हते. म्हणूनच, नंदिनी आणि त्यांच्या टीमने मंगळयानाला स्वयंचलित निर्णय घेण्याची क्षमता दिली. २४ सप्टेंबर २०१४ ला अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचले होते, पण यशस्वी होण्यासाठी अजून एक मोठे आव्हान उरले होते. यानाला मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात प्रवेश करण्यासाठी वेग कमी करणे गरजेचे होते. जर इंजिनने पुरेशी शक्ती न वापरली असती, तर मंगळयान मंगळाच्या कक्षेत न जाता पुढे वाहून गेले असते आणि जर शक्ती जास्त वापरली असती, तर यान मंगळाच्या पृष्ठभागावर आदळले असते. यासाठी, इस्रोने यानाचे इंजिन २४ मिनिटे अखंड कार्यान्वित ठेवले, ज्यामुळे वेग कमी झाला आणि अखेर… मंगळयानाने यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला! त्याक्षणी, इस्रोच्या संपूर्ण टीमसाठी हा आनंदाचा क्षण होता. भारत हा जगातील पहिला देश ठरला, ज्याने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यश मिळवले! अमेरिकेच्या NASA, युरोपच्या ESA आणि रशियाच्या Roscosmos नंतर, भारत हा जगातील चौथा देश ठरला, ज्याने मंगळाच्या कक्षेत स्वतःचे यान पोहोचवले.

या मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा आणि पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी पाच उपकरणे पाठविण्यात आली. मंगळयानाने मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो काढले. मिथेन वायू आणि हायड्रोजनच्या उपस्थितीचा अभ्यास केला, ज्याचा संबंध मंगळावर जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी असू शकतो. मंगळावरील हवामानाच्या स्थितीचा अभ्यास केला, जो भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाचा ठरेल. नासा आणि अनेक आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांनी इस्रोच्या किफायतशीर तंत्रज्ञानाचे आणि अचूक नियोजनाचे कौतुक केले. या मोहिमेचे आयुष्य फक्त ६ महिने अपेक्षित होते, पण ती तब्बल ८ वर्षे कार्यरत राहिली. भारताच्या भावी आंतरग्रहीय मोहिमांसाठी ती मार्गदर्शक ठरली, जसे की मंगळयान-२ व गगनयान. या मोहिमेने भारतीय वैज्ञानिक समूहाला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला. RISAT-१ – रडार इमेजिंग सॅटालाईट-१ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, शेती व आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा डेटा प्रदान करणाऱ्या मोहिमेत त्यांनी भूमिका बजावली. सध्या त्या इस्रोच्या ‘टेलिमेटरी ट्रॅकिंग व कमांड नेटवर्क सेंटर’- ISTRAC- मध्ये डेप्युटी डायरेक्टर आहेत. इस्रोच्या सर्व उपग्रहांच्या ट्रॅकिंग व नियंत्रणासाठी त्या जबाबदार आहेत. त्या १०-१४ तास सतत मेहनत घेणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्या दोन मुली व एका भाचीच्या आई आहेत. त्या युवतींना अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. भारतात STEM-(Science, Technology, Engineering, Mathematics) क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी त्या कार्यरत आहेत. सरकारने “नमो ड्रोन दीदी” आणि G-२० STEM शिक्षण प्रकल्पांद्वारे महिलांसाठी संधी निर्माण करण्यावर भर दिला आहे. डाॅ. नंदिनी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -