काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच आता रक्ताचं थरारक सावट… हो, आपण बोलतोय त्या नव्या अतिरेकी हल्ल्याबद्दल, ज्याने पुन्हा एकदा देशाच्या काळजावर घाव घातलाय… काय आहे हा नेमका प्रकार, चला जाणून घेऊ या…
पहलगामजवळच्या बैसरन… ज्याला “मिनी स्वित्झर्लंड” म्हणतात… तिथं पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत होते. पण अचानक दोन लष्करी गणवेशातील अतिरेकी आले… आणि सुरू झाला गोळ्यांचा पाऊस! धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा पडला. ३० पर्यटकांचा मृत्यू आणि १५ पेक्षा अधिक जखमी… त्यात परदेशी पर्यटकांचाही समावेश. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या डोंबिवली, पुणे आणि पनवेलमधलेही लोक होते. ते तिथं फिरायला गेले होते…
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सौदी दौरा अर्धवट सोडून देशात परतावं लागलं. गृहमंत्री अमित शहा तातडीनं काश्मीरला रवाना झाले. देशभरातून संताप व्यक्त होतोय. पण प्रश्न असा आहे की, केवळ संताप पुरेसा आहे का? पर्यटन हे केवळ उद्योग नाही, तर लोकांच्या स्वप्नांचा भाग असतो. तिथं जाऊन लोक निसर्गाचा अनुभव घेतात, आयुष्य जगतात. आणि जर अशा ठिकाणी दहशतीची छाया आली… तर ती स्वप्नंही चिरडली जातात.
Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामीच
३७० कलम हटवल्यावर सरकारने अनेकदा सांगितलं, काश्मीर आता सुरक्षित आहे. पण जर अतिरेकी खुलेआम लष्करी वेशात येऊन हल्ला करू शकतात, तर सुरक्षा यंत्रणा कुठं कमी पडल्या? ‘कश्मीर रेझिस्टन्स’ नावाच्या पाक-समर्थित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. त्यांचा दावा आहे की, गैर-काश्मिरींना इथं स्थायिक होऊ द्यायचं नाही… म्हणून आम्ही हिंसा करू. त्यामुळं हा केवळ एका भागावरचा हल्ला नाही, हे देशाच्या एकतेवरचं आव्हान आहे!
अतिरेकी हल्ल्यांनंतर फक्त कोम्बिंग ऑपरेशन करून भागणार नाही. गरज आहे अचूक कारवाईची. गरज आहे स्थानिक जनतेचा विश्वास जपणारी धोरणं राबवण्याची. आणि गरज आहे दहशतीला कायमचा उखडून टाकण्याची! आज जिथं रक्त सांडलंय, तिथंच पुन्हा एकदा आनंदाची चाहूल यायला हवी. काश्मीरच्या निसर्गात आपल्याला शांततेचा उजेड हवा आहे… आणि तो फक्त शब्दांनी नाही, तर ठोस कृतीनेच शक्य आहे.