मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी आहेत. तर अनेक पर्यटक जम्मू-काश्मीर येथे अडकले असून त्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने (State Government) कंबर कसली आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अॅक्शन मोडवर आले असून काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणण्यासाठी ते श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाजगी विमानाने जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. पेहेलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यानंतर तिथे अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेची मदत पथक काल श्रीनगरला रवाना झाले होते. त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू आणि काश्मीरला गेल्यामुळे सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मदत कार्याला अधिक वेग येणार आहे.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर रात्री १० ते ११ च्या दरम्यान सर्व पर्यटकांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांना मुंबईत कसे सुखरुप आणलं जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत.
हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ कार्यरत आहे. काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.