नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याविरुद्ध सरकार कोणतं पाऊल उचलते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष आहे. यादरम्यान आज बुधवारी संरक्षण मंत्री राजधान सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी जनतेला संबोधित करताना, दहशतवादावर प्रहार केला जाईल अशी घोषणा केली.
काश्मीरच्या पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांच्या प्रमुखांना चोख प्रत्युत्तर देणार असे आश्वासन राजनाथ सिंह यांनी जनतेला दिले. ते पुढे असे देखील म्हणाले की, सरकार प्रत्येक आवश्यक आणि उपयुक्त पावलं उचलत आहेत. ज्यांनी ही घटना घडवून आणली त्यांच्यापर्यंतच नाही, तर ज्यांनी पडद्यामागे राहून हा हत्याकांड घडवून आणला त्यांच्यापर्यंतही पोहोचू, असा घणाघात देखील त्यांनी केला. राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य पाकिस्तानसाठी एक स्पष्ट इशाराच मानला जात आहे.
जोरदार प्रत्युत्तर मिळेल: संरक्षक मंत्री राजनाथ सिंह
राजनाथ सिंह आज बुधवारी जनतेला संबोधित करताना म्हणाले, “मी देशवासियांना आश्वासन देतो की, भारत सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल. भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांपर्यंत तर आम्ही पोहोचू पण मागे राहून असं दुष्कृत्य करणाऱ्या त्यांच्या प्रमुखांना सुद्धा सोडणार नाही. भारत ही इतकी जुनी संस्कृती आणि इतका जुना देश आहे की, अशा दहशतवादी कृत्यांनी त्याला घाबरवता येणार नाही. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना लवकरच जोरदार प्रत्युत्तर मिळेल.”