मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचे शुक्लकष्ट काही कमो होत नाही, रोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अगोदरच मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल कधी खेळणार याकडे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. हिटमॅन रोहित शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे परवाचा सामना खेळू शकला नाही व आजचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका आहे. दुष्काळात तेरावा महिना. त्याप्रमाणे तिलक वर्माला परवाच्या सामन्यादरम्यान दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.
कागदावर भरभक्कम दिसणारा संघ आज विजयासाठी झगडताना दिसतो आहे. मागील तीन पराभवांमुळे मुंबई इंडियन्स संघाचे नक्कीच खच्चीकरण झाले आहे. आजचा सामना घरच्या मैदानावर होत असला तरी मुंबईसाठी विजय अशक्य दिसतो आहे कारण प्रतिस्पर्धी संघ हा बलवान आहे. मुंबईला चांगल्या सलामीची गरज आहे; परंतु सध्या मुंबईला सलामीच्या फलंदाजाची चिंता आहे. गेल्या सामन्यात रोहितच्या गैरहजेरीत विल जंक्सला सलामीला पाठविले; परंतु तो पाचच धावा करून बाद झाला. त्यामुळे आज मुंबई इंडियन्सच्या सलामीला कोणता फलंदाज येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंगळूरुने अठराव्या हंगामातील तीनपैकी दोन सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांची कामगिरी खराब झाली. मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, तरीही त्या संघाकडे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. आजचा सामना हा वानखेडे मैदानावर होत आहे जे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल तो फलंदाजी करून समोरच्या संघाला जास्त धावांचे आव्हान देईल. बंगळूरुची सलामीची जोडी चांगली सुरुवात करून देऊ शकते. विराट व सॉल्ट दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीचे तुल्यबळ दोन्ही बाजूला सारखेच आहे. तरीही आजच्या सामन्यात बंगळुरुचे वर्चस्व राहील कारण अजूनही मुंबईचा संघ हार्दिक पंडयाच्या नेतृत्वाखाली चाचपडताना दिसत आहे.