दणदणीत विजय मिळवत कंगनाने विरोधकांना लगावले टोले
मंडी : बॉलिवूडमधून विविधांगी भूमिका साकारत तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. इतकंच नव्हे तर कंगनाने भाजपाकडून (BJP) हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Loksabha) खासदारकीचं तिकीट मिळवत विजय पक्का केला आहे. राजकारणाकडे वळू नकोस असा सल्ला कंगनाला देणार्यांसाठी कंगनाचा विजय ही सणसणीत चपराक आहे.
तिकीट मिळाल्यानंतर कंगनाने संपूर्ण लक्ष राजकारणावर केंद्रित करत मंडीमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचा ७० हजारांहून अधिक मतांनी पराभव करत कंगना विजयी झाली आहे.
कंगना रनौत विजयानंतर विरोधी नेते विक्रमादित्य यांना उद्देशून म्हणाली की, ‘आता स्वस्तात बोलण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. एका महिलेबद्दल अशा निरर्थक गोष्टी बोलणे, मुलींचा केलेला अपमान मंडीतील जनेतला पटलेला नाही. आज मंडीतून भारतीय जनता पक्षाला ज्या प्रकारे आघाडी मिळाली आहे, त्यातून हे दिसत आहे. माझ्या मुंबईला जाण्यावर सवाल उठवतात, पण आता हीच माझी जन्मभूमी आहे आणि तिच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन. जसे मोदीजींचे स्वप्न आहे. सर्वजण मिळून विकास करू शकतात. त्यांची सेना म्हणून काम करेन, असे मी नेहमीच म्हटले आहे. त्यामुळे मी कुठेही जात नाही. कदाचित दुसऱ्याला त्यांची बॅग पॅक करून कुठेतरी जाण्याची गरज आहे’, असा टोलाही कंगनाने लगावला.
कंगनाने ट्विट करत मानले मंडीवासियांचे आभार
कंगनाने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत मंडीवासियांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले आहे की, मंडीतील सर्व लोकांनो, तुमच्या प्रेम आणि विश्वासाबद्दल धन्यवाद! हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा जनतेच्या आदराचा विजय आहे, असं कंगनाने म्हटलं आहे.