
नगरपालिका मुख्याधिकारी यांना कारवाईसाठी दिले पत्र
अलिबाग : शहरात सर्व प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत न फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून, रस्त्याच्या दुतर्फा लागणाऱ्या हातगाड्यांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. परिणामी शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याने भाजपाने हा मुद्दा उचलून धरीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याची मागणी भाजपाचे शहर अध्यक्ष अंकित बंगेरा यांनी अलिबाग नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचे आयोजन २२ ...
अलिबाग शहरातील मुख्य रस्त्यांवर विशेषतः एसटी स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि इतर मध्यवर्ती मार्गावर अनेक अनधिकृत फेरीवाले आपली दुकाने व ठेले लावून व्यवसाय करीत आहेत. हे फेरीवाले कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसतात आणि त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. शाळा, रुग्णालय व ऑफिसकडे जाणाऱ्या नागरिकांना त्याचा अपार त्रास सहन करावा लागतो. आपत्कालीन वाहनांना (रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा) मार्ग मिळत नाही. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे, कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीतही प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, नगर परिषदेकडून त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संताप वाढत आहे. याशिवाय मारुती मंदिर, चेंढरे ते नगरपालिका हा रस्ता खूप अरुंद स्वरूपाचा असून, वाहतुकीस अत्यंत अडथळा निर्माण करीत आहे, तसेच अलिबाग शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेले दोन्ही प्रमुख रस्ते अरुंद, अस्वच्छ व देखरेखअभावी खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची, प्रवाशांची आणि स्थानिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे रुंदीकरण आणि देखभाल करण्यात यावी. अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ आणि सातत्यपूर्ण व कठोर कारवाई करण्यात यावी. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस व नगर परिषद यांच्यात समन्वय वाढवावा असेही निवेदनात बंगेरा यांनी म्हटले आहे.