संदीप जाधव
बोईसर : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या विशाल ओबीसी आक्रोश मोर्चाला पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असूनदेखील दर्शन दुर्लभ झालेल्या दादा भुसे यांनी दांडी मारल्याने त्यांना या जिल्ह्याबद्दल खरंच आत्मियता आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील ओबीसी समजाचे आरक्षण आणि इतर विविध प्रश्नांबाबत ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या पुढाकाराने काल जिल्हाधिकारी कार्यालयावर जवळपास ५० हजार ओबीसी बांधवांचा विशाल असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या प्रमुख नेत्यांसोबतच डझनभर सर्वपक्षीय आमदार उपस्थित असताना जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी असलेले कृषी मंत्री दादा भुसे हे नेहमीप्रमाणे गायब असल्याने अनेकांकडून त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबादारी असली तरी त्यांचे जिल्हावासीयांना दर्शन दुर्लभ झाले आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १ मे महाराष्ट्र दिन किंवा नियोजन समितीची बैठक असे वर्षभरात काही मोजके दिवस सोडले, तर पालकमंत्री दादा भुसे हे जिल्ह्याकडे ढुंकूनही बघत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या मालेगाववरून मुंबईकडे जाताना कधीतरी वाट वाकडी करून नाशिक-जव्हारमार्गे ते एक सोपस्कार म्हणून पालघरला पायधूळ झाडत असतात.
त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील प्रशासनावर वचक नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापासून, ते इतर सरकारी विभाग हे ‘हम करे सो कायदा’ असे वागत असून भ्रष्टाचाराने अक्षरशः कळस गाठला असून जिल्ह्यातील जनतेची मात्र कामे न होता फरफट होत आहे. त्याचप्रमाणे आदीवासीबहुल जव्हार-मोखाडा तालुक्यात दर वर्षीप्रमाणे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे.जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी आणि मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न, बिघडलेली कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न असताना पालकमंत्री दादा भुसे हे मात्र दोन-तीन महिने जिल्ह्यात येतच नसल्याने सर्व प्रशासकीय व्यवस्था सुस्तावली असून त्याचा फटका मात्र जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे.