Sunday, May 18, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली...

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली...

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ


मुंबई : काही अपघात हे केवळ चुकून होत नाहीत, ते अमानुषतेच्या सीमाही ओलांडतात. गाडीने उडवलं, तरी का थांबवलं नाही? एक महिला, ४५ वर्षांची, गाडीखाली येऊन १.५ किमी फरफटत गेली... तरीही चालक फरार का झाला? काय माणुसकी इतकी स्वस्त झालीय का? Mumbai BMW hit and run case या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळताना ताशेरे ओढले आणि आरोपी मिहीर राजेश शहा याच्या जामिनाला नकार दिला. “हे प्रकरण सर्वात क्रूर घटनांपैकी एक आहे,” असे स्पष्ट मत न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.


७ जुलै २०२४. वरळीच्या अ‍ॅनी बेझंट रोडवर एका BMW कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवर प्रदीप आणि त्याची पत्नी कावेरी होते. प्रदीप कडेला फेकला गेला... पण कावेरी? ती गाडीच्या समोरच्या चाकात अडकली आणि ड्रायव्हरने गाडी थांबवण्याऐवजी तीला चक्क १.५ किलोमीटर फरफटत नेलं!



ही BMW चालवत होता मिहीर राजेश शहा. मिहीर हा शिवसेना नेत्याचा मुलगा. अपघातानंतर मिहीर फरार झाला. पण लोक संतापले होते. त्यामुळे प्रचंड दबावानंतर दोन दिवसांनी त्याला पालघरमधून अटक केले.


पण मिहीर शहाचे वकील म्हणाले, “अटक करण्याआधी पोलिसांनी कारणं देणं बंधनकारक आहे.” यावर न्यायालयाने संतापून थेट विचारले की, कोणीतरी रस्त्यावर गोळ्या झाडत असेल, तर पोलिसांनी आधी अटक करावी की आधी कारणं लिहीत बसावं? कायद्याच्या अंमलबजावणीवर अशा मागण्यांचा गैरवापर होत असल्याचा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, “मानवतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या आणि अमानुष कृत्य करणाऱ्या या घटनेत आरोपींना माफ करता येणार नाही.”




Comments
Add Comment